
Bhumika Temple Paryem: पर्ये येथे शुक्रवारी (२१ डिसेंबर) साखळेश्वर मंदिराच्या वर्धापनदिनी झालेल्या वादामुळे श्री भूमिका देवीच्या उत्सवावर शासनाने आदेश काढून बंदी घातली होती. यावरून संतप्त लोकांनी पर्ये येथे दोन ठिकाणी रस्ता बंद केला होता. यानंतर माजिक समाजाच्या गटाने वाळपईच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती मिश्रा यांनी परिपत्रक काढून सुरू होणाऱ्या उत्सवाला परवानगी दिली असून मंदिर बंदीचा आदेश मागे घेतला, त्यामुळे हा उत्सव सायंकाळपासून सुरू झाला. तसेच जमाव बंदीचाही आदेश मागे घेत पाचपेक्षा अधिक लोकांना येऊन उत्सव करण्यास परवानगी दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंदिर खुले राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
बैठकीनंतर माजिक समाजाच्या गटाने पत्रकारांना सांगितले की, पर्येच्या भूमिका देवीचा उत्सवावर बंदी घातल्यावर आमच्या समाज बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला. पण शासनाने बंदीचा आदेश मागे घेतला आहे. सायंकाळी सप्तकाने उत्सवाला सुरुवात केली. रविवारी गवळण, दहीकाला होणार आहे.
या विषयावर चर्चा करण्यासाठी गावकर समाजातील बांधव उपजिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते; परंतु उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा भेटल्या नाहीत. सायंकाळी ६.३० पर्यंत त्यांची वाट बघून गावकर समाज बांधव निघून गेले.
शासनाने बंदी उठविल्यानंतर मंदिरात जमलेल्या महिलांनी श्री भूमिका देवीचा मोठ्याने जयघोष करीत आनंद व्यक्त केला. दुपारी मंदिराला प्रदक्षिणा काढली. आम्हाला जेव्हा मंदिर बंदीची माहिती समजली, तेव्हा खूप वाईट वाटले. मंदिर वाचविण्यासाठी आम्ही सर्व रणरागिणी एकत्र आलो आहोत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पर्ये येथील श्री भूमिका देवीचा राखणदार साखळेश्वर मंदिराच्या वर्धापनदिनी झालेल्या वादानंतर आम्ही घेतलेल्या पूजा विधी आक्षेपानंतर शासनाने शुक्रवारी देवीच्या उत्सवाला बंदी घातली होती; पण आज उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी केवळ एकाच माजिक गटासोबत बैठक घेतली आणि उत्सवावरील बंदी उठविली. हा निर्णय आम्हाला अमान्य आहे. अंतिम निर्णय देण्याअगोदर आम्हालाही बैठकीस बोलवायला हवे होते, असे गावकर बांधवांचे म्हणणे आहे.
बंदी उठविल्यानंतर बैठकीला बोलाविणे चुकीचे असून शासनाने एकतर्फी निर्णय दिला आहे, असे सांगत सायंकाळी गावकर समाजबांधवांनी वाळपईचे उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली. त्यावेळी ऑर्डर बदलली नाही, तर ऑर्डरमध्ये बदल केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे गावकर बांधव म्हणाले.
शुक्रवारी रात्रीपासून पर्येतील मुख्य रस्ता शेकडो लोकांनी अडविला होता. रस्त्यावर जाळपोळ केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. ज्या लोकांनी रस्ता अडवून प्रवासी, तसेच वाहनचालकांना त्रास दिला, अशांवर कडक कारवाई केली पाहिजे. या आंदोलनावेळी लोकांनी दगडफेक करून पोलिसांनाही जखमी केले आहे. त्यामुळे संशयितांवर कारवाईची मागणी गावकर बांधवांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.