पणजी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिलेला नाही.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांत खंडणीवसुलीवर गुन्हे घडत आहेत. या टोळ्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी केला.
या टोळ्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने विशेष कार्यदल नेमण्यात यावा. सरकारने कारवाई केली नाही तर या टोळ्यांना सरकारचाच पाठिंबा आहे हे सिद्ध होईल. गेल्या काही दिवसांत खून, चोऱ्या तसेच गंभीर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. म्हापसा कॉन्स्टेबलवरच गुन्हेगारांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यावरून गुन्हेगार पोलिसांनाही घाबरत नाही. यावरून गोव्यात गुंडप्रवृत्ती निर्माण झाली आहे व त्याला सरकार जबाबदार आहे, असा दावा कवठणकर यांनी केला.
गुन्हेगारांबाबत गुप्त माहिती असूनही पोलिस अनेकदा कारवाई करीत नाही. त्यांचेच या गुन्हेगारांशी साटेलोटे असल्याने हल्लेखोर मोकाट फिरतात. खंडणीवसुलीवरून राज्यात अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार झाल्या आहेत.
त्याला पोलिस यंत्रणेचाही अप्रत्यक्षपणे पाठिंबा आहे. काही गुन्हेगारांना सत्तेमधील काही राजकारणी पाठीशी घालत असल्याने पोलिसांवरही कारवाई करताना दबाव येत आहे. गुन्हेगार व टोळ्यांना पाठिंबा असल्याशिवाय या टोळ्या तयार होणे अशक्य आहे, अशी टीका कवठणकर यांनी केली.
कायदा व सुव्यवस्था ढासळली असताना मुख्यमंत्री मात्र आमदार मायकल लोबो यांनी काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्याकडे कसे घेऊन आले यावर चर्चा करतात. त्यांना राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गंभीरपणा नाही. काही दिवसांपूर्वी मृत अर्भकाचे अवयव मिळाले. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण संवेदनशील नसल्याचे वक्तव्य केले जात आहे, यावरून पोलिस यंत्रणा गुन्ह्यांबाबत किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो, असे कवठणकर म्हणाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हप्ते...
सरकारचा बेकायदेशीर कारवायांना पाठिंबा असल्यानेच गुन्हेगारी टोळ्यांचे फावले आहे. त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हप्ते पोहचत असल्याने कारवाई होत नाही असा आरोप कवठणकर यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.