पणजी, गोव्यासह महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, केरळमध्ये तसेच लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार बेटांवर दि. ४ व ५ मे रोजी समुद्रात मोठ्या लाटा उसळणार आहेत.
त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच संबंधित सर्व घटकांनी याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन हैदराबाद येथील भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा संस्थेने केले आहे.
दक्षिण हिंद महासागरातून येणाऱ्या उच्च लहरी लाटा वरील राज्यांच्या आदळण्याची तसेच किनाऱ्यांवरील सखल भागात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता केंद्र सरकारच्या या संस्थेने व्यक्त केली आहे. मच्छीमारांना आणि किनारपट्टीवरील लोकांना त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या मोठ्या लाटा किनाऱ्याकडे सरकण्यास २८ एप्रिल रोजी सुरू झाल्या आहेत. किनाऱ्यापासून १० हजार किलोमीटर दूरवर या लाटा होत्या आणि आता त्या किनाऱ्यावर कधीही आदळू शकतात इतक्या जवळ आल्या आहेत, असे संस्थेचे संचालक टी. बाळकृष्णन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांच्या नावाने पाठवलेल्या संदेशात नमूद केले आहे.
शनिवारी उत्तररात्री ‘जागते रहो’
सदर लेखी इशाऱ्यानुसार उद्या शनिवारी ४ मे रोजी उत्तररात्री अडीच वाजता या मोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू शकतात. यावेळी भरती असेल तर किनारी भागातील सखल भागात समुद्राचे पाणी घुसण्याची शक्यता आहे.
समुद्राच्या पोटात घडणाऱ्या घडामोडींवर संस्थेने बारीक नजर ठेवली आहे. याबाबतची माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर दिली जात आहे. www.incois.gov.in/portal/osf/osf.jsp येथे लोक ही माहिती बघू शकतील, असेही या संस्थेने कळविले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.