
Omkar elephant Goa news: गेल्या काही दिवसांपासून 'ओंकार' हत्ती गोव्यातील विविध भागांत धुडगूस घालत आहे. तांबोसे गावातील शेतकऱ्यांची लाखो रुपयांची कवाथे, भातशेती आणि केळींची नासधूस केल्यानंतर आता या हत्तीने उगवे गावातील भातशेतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यामुळे येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. मात्र, राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी यावर जी प्रतिक्रिया दिली आहे, ती ऐकून गोमंतकीय जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी पत्रकारांनी कृषीमंत्री रवी नाईक यांना ओंकार हत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्यांना आम्ही भरपाई देऊ. हत्ती हे गणपतीचे रूप आहे, तो लोकांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आला आहे." रवी नाईक यांचे हे उत्तर ऐकून अनेकजण अचंबित झाले आहेत, कारण एका बाजूला हत्ती पिकांचे प्रचंड नुकसान करत असताना, मंत्री महोदयांनी त्याचे धार्मिकरण केले आहे.
गेले सात दिवस ओंकार हत्तीने तांबोसे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. यावर कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी अजूनही कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. शेतात आणि बागायतीत किती नुकसान झाले, याचा अंदाज घेण्यासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी अद्याप शेतकऱ्यांची भेटही घेतलेली नाही.
नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न संतप्त शेतकरी आता विचारत आहेत. एका बाजूला प्रशासकीय यंत्रणा कामात दिरंगाई करत असताना, दुसरीकडे मंत्र्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.