

पणजी: गोवा विद्यापीठाद्वारे कायदा महाविद्यालयाच्या ज्या विद्यार्थ्यांचे मागील सत्रातील पेपर अनुत्तीर्ण असतील तर त्यांना पुढील सत्रात प्रवेश मिळणार नसल्याचा अध्यादेश काढण्यात आला होता; परंतु याची कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली नव्हती तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे काही पेपर व प्रवेश फीदेखील स्वीकारण्यात आली.
मात्र, आता त्यांना प्रवेश नाकारला जात असून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ‘एनएसयूआय’ गोवाचे सरचिटणीस कुमार गवळी यांनी केली आहे. ते गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी अब्दुल सय्यद आणि इतर विद्यार्थ्यी उपस्थित होते.
गवळी म्हणाले की, आम्ही कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती त्यांना दिली. विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश द्यावा, अशी मागणी केली.
कुलगुरूंनी दोन्ही कायदा महाविद्यालयांच्या म्हणजे कारे महाविद्यालय आणि साळगावकर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना बोलवून या समस्येबाबत कोणता तोडगा काढता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी योग्य ती भूमिका घेतली जाणार असल्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले आहे.
आम्ही ‘आरटीआय’ दाखल करणार!
दोन्ही कायदा महाविद्यालयांत मिळून १८० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी एक तृतीयांश विद्यार्थ्यांना या अध्यादेशामुळे प्रवेश नाकारला जात आहे. या अध्यादेशाबाबत विद्यार्थीच नव्हे तर महाविद्यालयांच्या प्राचार्यांनादेखील माहिती नव्हती.
जर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचाच नव्हता तर त्यांची प्रवेश फी का घेतली? कुलगुरू व प्राचार्यांच्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याची माहिती मिळविण्यासाठी आम्ही ‘आरटीआय’ दाखल करणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.