

मोपा विमानतळ झाल्यापासून उत्तर गोव्यात व विशेषतः पेडणे व बार्देस तालुक्यात विविध प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यांत विशेषतः गुन्हेगारी कारवायांची संख्या जास्त असल्याचे अनेकांचे निरिक्षण आहे.याच आठवड्यांत घडलेल्या घटना तर सगळ्यांचीच चिंता वाढविणाऱ्या ठरल्या असून त्यामुळे केवळ सरकारनेच केवळ नव्हे तर सर्वांनीच त्यांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उगवे येथील गोळीबार, त्यानंतर पर्यटकांना झालेली बेदम मारहाण व त्यानंतर डोंगर कापणीतून मोरजी येथे झालेल्या मारहाणीतून एका ज्येष्ठ नागरिकाला आलेला कथित मृत्यू पाहिला तर गोवा आता पूर्वीचा राहिलेला नाही, असेच लोक म्हणू लागले आहेत. उत्तर गोव्यातच नव्हे तर इतरत्रही शॅक असो वा अन्य व्यापारी आस्थापने असोत त्यांचा व्यवहार केवळ परप्रांतीयच नव्हे तर विदेशी नागरिकही चालविताना दिसतात. त्यांतूनच तर ही गुन्हेगारी बोकाळलेली नाही ना, अशी शंका कोणी घेतली तर त्याला दोष कसा काय देणार!. ∙∙∙
सध्या गाेव्याची जी काय वाताहात झाली आहे ती काँग्रेसमुळे असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल केले. काँग्रेसने जी बीजे रोवली, त्याची फळे आम्ही सध्या भोगत आहोत, असे नाईक म्हणाले. त्यानंतर समाज माध्यमावर ताे एक चर्चेचा विषय बनला. याचे कारण म्हणजे, सध्या भाजपात जे आमदार आणि मंत्री आहेत त्यातील ८० टक्के मंत्री आणि आमदार आहेत ते मूळ काँग्रेसचे. त्यामुळे दामू नाईक यांनी कुणाला उद्देशून हे वक्तव्य केले असा प्रश्न कित्येकांना पडला आहे. काँग्रेसने जे बी रोवले आहे, त्याचा आता भाजपमध्ये वृक्ष बनला आहे, अशा आशयाच्या ‘कॉमेंट्स’ सध्या समाज माध्यमांवरून फिरत आहेत. आता हा दावा खोडून काढण्यासाठी दामूबाब पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतात की काय, ते पहावे लागेल? ∙∙∙
परवा बांबोळी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सॅपेक टॅकरोचे दोघे राष्ट्रीय पदाधिकारी जागीच मरण पावले. पण त्या महामार्ग टप्प्यात झालेला हा काही एकमेव अपघात नाही, तर अनेक अपघात हा महामार्ग कार्यरत झाल्यावर होऊन अनेक निरपराध मरण पावले आहेत वा जायबंदी तरी झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे ‘इंजिनियरींग’ अचूक झालेले नाही, असे जाणकार म्हणत आहेत. पण त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. त्यामागील कारण दिल्ली दरबारांत भारी वजन असलेला ठेकेदार तर नव्हे ना, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. सदर ठेकेदाराने गोव्यात केलेले राष्ट्रीय महामार्गाचे अनेक टप्पे असेच मृत्यूचे सापळे ठरलेले आहेत. परवाच्या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याची पहाणी केली तरी त्यांनी नेलेले साबांखा व पोलिस खात्याचे अधिकारी हे होयबा वर्गांतील असल्याने खरेच समस्येचे निराकरण होणार का, असा प्रश्न केला जात आहे. ∙∙∙
थिवी येथील वीज उपकेंद्रातील सहायक अभियंत्यास (एई) पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कामाच्या ठिकाणाहून नेल्यावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या मतदार यादी पुनरावलोकन कार्यक्रमासाठी सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियम व अटींचे पालन जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली होते. त्यामुळे ज्या-ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक मतदार यादी पुनरावलोकनासाठी झाली आहे, त्यांनी काम स्वीकारण्याच्या दिवशी हजर होणे आवश्यक होते. परंतु काहीजणांकडून त्याकडे काणाडोळा झाल्याने त्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश निघाल्यामुळे पोलिसांना आहे त्या ठिकाणावरून उचलून आणून जिल्हाधिकाऱ्यांपुढे हजर करण्याची ड्युटीच लागली. वीज खात्याच्या एईला ज्याप्रकारे उपकेंद्रातून पोलिस घेऊन गेले, तसेच नदी परिवहन खात्यातील स्टोअरकिपर म्हणून काम करणाऱ्या परबांना पेडण्यातून राहत्या घरासमोरून पोलिस उचलून घेऊन गेले म्हणे. सध्या ते जेथे राहतात, त्याठिकाणी आणि नदी परिवहन खात्यात हा विषय चांगलाच चर्चिला जात आहे. शिवाय परबांच्या घरातील व्यक्तींनाही अशा कार्यवाहीचा सुगावाही लागला नसल्याचीही चर्चा आहे. ∙∙∙
फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याने आता इच्छुकांनी कार्यक्रम उपक्रमांवर भर देण्यास प्रारंभ केला आहे. अशा कार्यक्रमांची मोठी जाहिरातबाजीही केली जात आहे. एकंदर सर्व इच्छुकांकडून कोणत्याही स्थितीत फोंडा जिंकायचेच यावरच भर देण्यात येत आहे. कार्यक्रम आणि उपक्रम साकारून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न या इच्छुक उमेदवारांकडून होत असल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही होत आहे. पण शेवटी मतदारराजा काय करील त्यावरच सर्वकाही अवलंबून आहे. ∙∙∙
जनसंपर्क तुटणे हे राजनेत्यांना नुकसानीचे होऊ शकते ही बाब आता कुंकळ्ळीचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांना समजले असणार. युरीने विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपला घरचा पत्ता बदलून कुंकळ्ळी केला होता त्याचा फायदा युरीला निवडणूक जिंकण्यात झाला. मात्र, युरी कुंकळ्ळीत राहिले नाही, ही बाब वेगळी. युरी जनतेशी ‘डिस्कनेक्ट’ झाले आहेत असा आरोप होत होता. आता युरीने जनतेशी ‘कनेक्ट’ होण्यास सुरवात केली आहे. युरी आलेमाव प्रत्येक वाड्यावाड्यांवर जाऊन मतदारांशी संवाद साधतात व त्यांच्या समस्या जाणून घेतात. मतदारसंघ विकासासाठी मतदारांच्या अपेक्षा जाणून घेतात. मतदारांना आपल्या वाढदिवसाचे खास निमंत्रण ही देतात. आता युरीला मतदारांकडून सकारात्मक ‘रिस्पॉन्स’ मिळायला लागला आहे. मतदारांनी जाहीर केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हानही आहे. आता थोड्या वेळात ही शिव धनुष्य युरी कसे पेलणार, हाच खरा प्रश्न आहे. ∙∙∙
वरचावाडा मोरजी येथे उमाकांत खोत यांचा संशयास्पद मृत्यूची खबर पोलिसांना मिळण्याआधी आमदार जीत आरोलकर यांना मिळाली होती. अर्थात आरोलकर हेही पूर्वी पोलिस होते म्हणा. ज्यावेळी त्यांना ही खबर मिळाली तेव्हा ते नेमके राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत होते. झाले, मुख्यमंत्र्यांनी लागलीच पोलिस महासंचालकांना याची माहिती दिली आणि तपासाची सूचना केली. मालमत्ता वादातून हा मृत्यू झाल्याचा खोत यांच्या नातेवाईकांचा दावा आहे. त्यामुळे पोलिसांवर वाढता दबाव आहे. त्याचमुळे पोलिस उप अधीक्षक सलिम शेख यांना पेडणे तालुक्यातील तिन्ही निरीक्षकांना या प्रकरणाच्या तपासात गुंतवावे लागले आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.