

मडगाव: मडगाव पालिकेच्या बुधवारी झालेल्या बैठकीच्या प्रारंभीच फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी प्रस्तावित केलेल्या विकासकामांवरून गोवा फॉरवर्डचे नगरसेवक आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
फातोर्डा प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका श्वेता लोटलीकर यांनी आपण सुचविलेली कामे आमदारांच्या नावावर कशी दाखवण्यात आली, असा सवाल उपस्थित केला. त्याचवेळी नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनीही आमदार सरदेसाई यांच्यावर टीका केल्याने गोवा फॉरवर्डचे नगरसेवक रवींद्र नाईक आणि बार्रेटो यांच्यात वाद रंगला. अखेरीस मुख्याधिकारी मधु नार्वेकर यांनी मध्यस्थी करत वाद शांत केला.
नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनीही आमदारांना प्रस्ताव मांडण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत त्यावर आक्षेप घेता येणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, घरोघरी कचरा संकलनासाठी निविदा प्रक्रिया कायद्यानुसार सुरू करण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचे सत्ताधारी पक्षाने स्पष्ट केले. विरोधी नगरसेवकांनीही या निर्णयाला आक्षेप घेतला नाही.
याच आठवड्यात काँग्रेसचे मडगाव गट संयोजक सावियो कुतिन्हो यांनी कचरा व्यवस्थापनात ६ कोटी ५३ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पालिका बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, बैठकीत या विषयावर फारशी चर्चा झाली नाही. बैठकीनंतर नगराध्यक्ष शिरोडकर यांनी, आम्ही केवळ हा विषय विषयपत्रिकेवर आणला होता. त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला, असे सांगितले.पालिका क्षेत्रातील कचरा संकलनानंतर तो काकोडा येथील प्रकल्पात पाठवण्यासाठी वर्षाला सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे सांगण्यात आले.
घरोघरी कचरा संकलनासाठी पालिकेकडून दोन एजन्सी नियुक्त करण्यात आल्या असून त्यांचा कार्यकाळ ३१ जुलै रोजी संपणार आहे. पालिका मंडळाची मुदतही या महिन्यात संपत असल्याने आणि निवडणुका अद्याप जाहीर न झाल्याने प्रशासक नेमण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच महिने लागतात. त्या काळात कचरा संकलन थांबवता येणार नसल्याने निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आम्ही केलेले आरोप सत्य आहेत. आमच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला तरी हरकत नाही, असे काँग्रेसचे मडगाव गट संयोजक सावियो कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पालिका बैठकीत नगराध्यक्षांनीच एप्रिलमध्ये निवडणुका होणार असल्याने हा विषय आणल्याचे मान्य केले. नंतर निवडणुका पुढे ढकलल्यानंतर इतिवृत्तात बदल करण्यात आला. आमचा प्रश्न इतकाच आहे की, जो ठराव घेतलाच नाही तो इतिवृत्तात कसा समाविष्ट झाला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.