VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Goa Highway Waterlogging: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण आणि राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Mumbai Goa Highway Waterlogging
Mumbai Goa Highway WaterloggingDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण आणि राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला असून रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सुकेळी खिंडीत तीन फूट पाणी

रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुकेळी खिंडीच्या अलीकडील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नागोठणेहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन फूट पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्ता पूर्णपणे जलमय झाला असून वाहनांची हालचाल अशक्य झाली आहे.

यामुळे मुंबईकडे आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक दोन्ही बाजूंनी थांबली आहे. अनेक मालवाहू ट्रक, खासगी वाहने आणि प्रवासी बस महामार्गावर अडकून पडल्या आहेत.

Mumbai Goa Highway Waterlogging
Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

कोलाड नाक्यावरही गंभीर परिस्थिती

सुकेळी खिंडीपुरतीच ही समस्या मर्यादित नसून, येथून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील कोलाड नाका परिसरातही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सुरुवातीला वाहने अत्यंत संथ गतीने सुरू होती, मात्र सकाळी साडेसात वाजल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

वाहनांच्या वाढत्या रांगांमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून अनेक प्रवाशांना तासन्‌तास महामार्गावर थांबावे लागत आहे.

पर्यायी मार्गांचा वापर

वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाहनचालकांना खोपोली – पाली – निजामपूर या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी ओसरल्यानंतरच मुख्य महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai Goa Highway Waterlogging
Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, हवामान विभागाने कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे पुढील काही तासांतही परिस्थिती गंभीर राहू शकते. प्रशासनाने नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com