म्हापसा येथील एका नामांकित सराफी दुकानामध्ये चोरी करून चोरांनी कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरले होते. म्हापसा बाजाराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडल्याने ही धक्कादायक घटना आहे. त्यामुळे चोरी आणि इतर गुन्हे रोखण्यासाठी गुप्त माहिती गोळा करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला आहे. बाजारात रोज हजारोंच्या संख्येने लोक ये-जा करत असतात.
चोरीच्या ठिकाणापासून काही अंतरावर पोलिस स्थानक असून, गस्त घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिस गस्तीदरम्यान काय करतात याची कल्पना करता येत नाही. चोरटे रस्त्यावरील लोकांनाही लक्ष्य करत आहेत. पोलिस सतर्क नाहीत का? पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला गुन्हे रोखण्यास सातत्याने अपयश का येत आहे, असा प्रश्न फेरेरा यांनी केला.
गुन्हे रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. केवळ अटक करणे, दंडाची पावती फाडणे यासारखी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचीच जबाबदारी नाही. या अपयशासाठी मी पोलिसांना जबाबदार धरतो. पोलिस यंत्रणेने जनतेच्या कल्याणासाठी काम करावे. चोरट्यांनी एका दुकानाला लक्ष्य केले आहे. भविष्यात ते आमच्या घरांना लक्ष्य करून बंदुका घेऊन येऊ शकतात, आम्हाला धमकावू शकतात आणि गुन्हे करू शकतात. पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे, असे फेरेरा म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.