

पणजी: हवामान विभागाच्या अंदाजानुसार अखेर रविवारी पावसाने राज्यात हजेरी लावली. काही भागांत तुरळक, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र, सोमवार आणि मंगळवारी विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केल्याने पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे.
यंदा राज्यात अपेक्षेनुसार ५ जून रोजी मान्सूनचा पाऊस दाखल झाला. परंतु, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे त्यानंतरच्या १५ दिवसांत पावसाने देशभरासह गोव्याकडेही पाठ फिरवली. यंदाच्या मान्सून हंगामात १ ते २० जून या कालावधीत राज्यात ६.५३ इंच पावसाची नोंद झाली असली, तरी त्यातील बहुतांश पाऊस हा १ ते ५ जून या काळात पडलेला आहे.
त्यानंतर अपेक्षेनुसार पाऊस पडला नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज बांधत भातशेतीसाठी तरव्यांची लावण केली होती. अनेकांनी भाज्यांचीही लागवड केली होती. आंबा, फणस उत्पादकांनी झाडांना खतेही घातली होती.
पण, अनेक दिवस पाऊस न झाल्याने आणि राज्यात उन्हाळ्यासारखे दिवस आल्याने भाताचा तरवा जळून गेला, भाज्या सुकल्या, तर खतेही मातीमोल झाली. दुसरीकडे, पाऊस नसल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे.
७२.४ टक्क्यांची तूट
१ ते २१ जून या मान्सून हंगामात राज्यात सरासरी ६०७.६ मिमी इतक्या पावसाची नोंद होते. यंदा मात्र या कालावधीत केवळ १६७.५ मिमी पावसाची नोंद झालेली असल्याने पावसाच्या सरासरीतील तूट ७२.४ टक्के इतकी झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.