

पणजी: राज्यात गेल्या आठवडाभरापासून मान्सूनचा जोर ओसरला असून पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. गुरुवार आणि शुक्रवारी तर राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा एक थेंबही पडला नाही. मागील २४ तासांत केवळ जुने गोवे परिसरात तुरळक पावसाची नोंद झाली.
पावसाचा वेग मंदावल्यामुळे राज्यातील जलसाठ्यांवर परिणाम होऊ लागला असून तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून ते सामान्य तापमानाच्या तुलनेत तब्बल ४.१ अंश सेल्सिअसने अधिक नोंदविले गेले आहे. शुक्रवारी राज्यातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे.जून महिन्यात सूर्यकिरणांची तीव्रता वाढत असली तरी साधारणपणे या काळात मान्सून सक्रिय असल्याने वातावरणात गारवा असतो. मात्र यंदा मान्सूनचा अपेक्षित जोर अद्याप दिसून आलेला नाही. आकाशात ढगांची वर्दळ कमी असून पावसाचा अभाव असल्याने उष्णतेची तीव्रता वाढत आहे.
या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना एनआयओचे शास्त्रज्ञ एम. रमेशकुमार यांनी सांगितले की, सामान्य तापमानाच्या तुलनेत सलग अनेक दिवस ४ अंशांच्या आसपास वाढ कायम राहणे चिंताजनक आहे.
मान्सून सक्रिय न झाल्याने आणि वातावरण कोरडे राहिल्याने नागरिकांना उष्म्याचा अधिक त्रास जाणवत आहे. त्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिवसभर बाहेर काम करणाऱ्यांनी पुरेसे पाणी पिणे, उन्हात दीर्घकाळ वावर टाळणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
...प्रतीक्षा सोमवारची!
राज्यात पावसाचा जोर मंदावल्याने नागरिक पावसाची चातकासम वाट पाहत आहेत. राज्यात सोमवार आणि मंगळवार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.