
पणजी: राज्यातील विविध पोलिस स्थानकांत मोबाईल फोन हरवण्याचे तसेच चोरीला जाण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या पाच वर्षात ३६,५७५ तक्रारी दाखल झाल्या आहेत म्हणजेच प्रतिमाह सरासरी ६०० मोबाईल तक्रारी दाखल होत आहेत. एकूण हरवलेल्या मोबाईल फोनपैकी १,५६९ (४.२ टक्के) मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. कळंगुट पोलिस स्थानकात मोबाईल फोन हरवल्याच्या सर्वाधिक ७,६५३ घटनांची नोंद झाली. पोलिसांना यातील केवळ २०९ फोन पुन्हा मिळवण्यात यश आले आहे.
हरवलेले किंवा चोरलेले मोबाईल कोणी वापरत असल्यास त्याचा शोध घेण्याची अत्याधुनिक यंत्रणा पोलिस विभागाकडे असून त्याच्या मदतीने मोबाईल फोनचा तपास लावण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी विचारलेल्या प्रश्नावर विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.
गेल्या पाच वर्षात नोंद झालेल्या मोबाईल फोन हरवलेल्या किंवा चोरल्याच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक तक्रारी या कळंगुट व म्हापसा पोलिस स्थानकात आहेत. या दोन्ही पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारींचे प्रमाण सरासरी २० ते २५ टक्के आहे.
कळंगुट परिसरात पर्यटकांचे फोन हरवण्यापेक्षा चोरण्याचे प्रकार अधिक घडले आहेत. म्हापसा परिसरात दुचाकीवरून प्रवास करताना मोबाईल हरवण्याच्या तक्रारी म्हापसा पोलिसांत दाखल झाल्या आहेत.
२०२० साली राज्यातील ३१ विविध पोलिस स्थानकांत ४५०० मोबाईल हरवल्याची अथवा चोरल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १३७ प्रकरणांचा छडा लागला असून १३५ फोन मालकाला परत करण्यात आले आहेत.
२०२१ मध्ये ६,०२८ मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांनी यातील १७१ फोन शोधून काढले, तर सर्व १७१ तक्रारदारांना त्यांचे फोन पुन्हा देण्यात आले. २०२२ मध्ये ८,२९५ मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांनी ३३८ फोन शोधून काढले, तर ३३७ तक्रारदारांना त्यांचे फोन पुन्हा देण्यात आले.
२०२३ मध्ये सर्वाधिक ८,९९५ मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी यातील ४५० फोन शोधून काढले, तर ४४७ तक्रारदारांना त्यांचे फोन पुन्हा देण्यात आले. त्या वर्षात फोन हरवल्याच्या सर्वाधिक २,७६५ तक्रारी कळंगुट पोलिस स्थानकात दाखल झाल्या होत्या. २०२४ मध्ये ८,७५७ मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी यातील ३६७ फोन शोधून काढले, तर ३६० तक्रारदारांना त्यांचे फोन पुन्हा देण्यात आले.
राज्यात २०२० ते २०२४ दरम्यान झालेल्या ‘सनबर्न’ या इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सवस्थळी ८२२ मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांना यातील केवळ ६६ फोन शोधून काढण्यात यश आले. सापडलेले सर्व ६६ फोन त्यांच्या तक्रारदारांना पुन्हा देण्यात आले. या पाच वर्षांच्या काळात कळंगुट पोलिस स्थानकात मोबाईल फोन हरवल्याच्या सर्वाधिक ७,६५३ घटनांची नोंद झाली. पोलिसांना यातील केवळ २०९ फोन पुन्हा मिळवण्यात यश आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.