
पणजी: गोवा विधानसभा अधिवेशनात आमदार वीरेश बोरकर यांनी म्हादई नदीच्या मुद्द्यावर तीव्र भूमिका मांडली. कळसा-भंडुरा प्रकल्पावर सरकारकडून होत असलेल्या विलंब आणि उदासीनतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. म्हादईला गोमंतकीयांची आई संबोधत, ही नदी वाचवण्यासाठी सरकार नेमके काय करत आहे, असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला.
आमदार बोरकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी एका खास समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या समितीची अद्याप एकही बैठक झालेली नाही. या समितीने प्रकल्पाच्या जागेची पाहणी करणे आवश्यक असतानाही, त्या दिशेने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.
गेल्या १२ वर्षांत, म्हणजेच २०१२ ते २०२५ या कालावधीत म्हादईच्या मुद्द्यावर मोठा खर्च झाला आहे. सरकारकडे ९.०६ कोटी रुपये जमा असून, वकिलांसाठी ६.७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एकूण १५.८३ कोटी रुपये खर्चूनही या प्रकरणाची सुनावणी मोठ्या प्रमाणात लांबत आहे, याकडे बोरकर यांनी लक्ष वेधले. 'या मुद्द्यावर अजूनही तारीख पे तारीख सुरू आहे. यात राजकारण करण्याची गरज नाही,' असे म्हणत त्यांनी निष्क्रियतेचा आरोप केला.
बोरकर यांनी पुढे सांगितले की, 'मी स्वतः या विषयावर समितीची मागणी केली होती, पण मलाही अद्याप प्रकल्पाच्या जागेची पाहणी करायला नेलेलं नाही.' त्यांनी आपला मुद्दा संपवताना सभागृहाला विचारले, 'म्हादई जर का गोमंतकीयांची आई असेल, तर हा मुद्दा अजून का सुटत नाही?'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.