

सासष्टी: पालिका बागेतील इमारतीचा प्रकल्प रद्द करावा. प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार मडगाववासीयांनी केला आहे, असे शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनी स्पष्ट केले. मडगावच्या नागरिकांना विश्वासात घेऊनच बागेच्या नूतनीकरण कामाला हात घालावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच आराखड्यासंदर्भात एक निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
‘जीएसआयडीसी’कडून ‘आरटीआय’ द्वारे मडगाव नगरपालिका बागेतील प्रस्तावित दोन मजली इमारत प्रकल्पाबद्दल मिळवलेल्या कागदपत्रांचे सादरीकरण करण्यास शेडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी पालिका बागेतच लोकांना आमंत्रण दिले होते. मात्र, उपस्थितांपेक्षा पोलिसांची जास्त संख्या आज बागेच्या प्रवेशद्वारावर लोकांनी पाहिली.
याबद्दल विचारले असता पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांनी जारी केलेला प्रतिबंधात्मक आदेश उपस्थितांना दाखवून त्यांना बागेत शिरण्यापासून रोखले. यावेळी पोलिस व उपस्थितांत खडाजंगी झाली, त्यानंतर संयुक्त मामलतदार अभिषेक नाईक व संध्या पै आंगले यांना पाचारण करण्यात आले.
प्रतिबंधात्मक आदेशाचा अधिकार सीओंना आहे?
मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांनी शनिवार कार्यालयाला सुट्टी असताना सुद्धा १८ तारखेने पोलिस निरीक्षकांच्या नावे प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. प्रतिबंधात्मक आदेश दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी काढू शकतात, असा आदेश काढण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना आहे का, असा प्रश्न उपस्थित लोकांनी पोलिस निरीक्षकांना केला.
मुख्याधिकाऱ्यांनी जो आदेश काढला आहे, त्यात बागेच्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारीमुळे आदेश काढण्यात आल्याचे नमूद केले आहे. बागेच्या परिसरात रहिवासी आहेत का? पोलिसांनी या तक्रारीची शहानिशा केली आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मडगावकरांनाच प्रवेश बंद
जेव्हा आराखड्याचे सादरीकरण पाहण्यासाठी लोक बागेच्या प्रवेशद्वाराकडे जमले तेव्हा पोलिसांनी त्याना आत जाण्यापासून रोखले. पण त्या पूर्वी बागेत शेकडो स्थलांतरीत उपस्थित होते. त्यांना आत जाऊ दिले, मग आम्ही मडगावचे नागरिक असून आम्हाला प्रवेश का नाही, असा प्रश्न यावेळी लोकांनी उपस्थित केला.
रविवार असूनही बागेच्या प्रवेशद्वाराला टाळे का?
आज रविवार होता पण नगरपालिकेने संध्याकाळी बागेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकलेले आढळले. त्यामुळे आपल्या मुलांना घेऊन आलेल्या कित्येक पालकांना परत जावे लागले. या बागेला पालिकेने आजच टाळे का लावले असा प्रश्न उपस्थितांनी केला.