
काणकोण: अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या काणकोण येथील रवींद्र भवनाला मंगळवारी (२० मे) मुसळधार पावसामुळे भीषण गळती लागली. यामुळे पहिल्या मजल्यावर असलेल्या कला आणि संस्कृती विभागाच्या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, ज्यामुळे हजारो पुस्तके भिजून खराब झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
पाण्याच्या गळतीमुळे आणि संततधार पावसामुळे मंगळवारी (दि.२०) सायंकाळचा ठरलेला तियात्र कार्यक्रम रद्द करावा लागला. रवींद्र भवनातील कर्मचाऱ्यांनी साचलेले पाणी बाहेर काढण्याचा आणि मालमत्ता वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र गळती सुरूच असल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. खबरदारीचा उपाय म्हणून, पाण्याचा निचरा होईपर्यंत इमारतीचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता.
काणकोण नगरपरिषदेचे नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच रवींद्र भवनाचे उद्घाटन करण्याची घाई सरकारने केल्याचा आरोप केला आहे.
तर, माजी अध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी इमारतीच्या बांधकामातील निष्काळजीपणाबद्दल ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे सदस्य अमरनाथ पणजीकर यांनी सोशल मीडियावर या घटनेचे वर्णन करताना म्हटले आहे की, "पहिल्याच पावसात इमारत पाण्याखाली गेली आहे, पुस्तके खराब झाली आहेत, सगळीकडे पाणी गळत आहे." त्यांनी भाजप सरकारवर टीका करत म्हटले, "कमजोर आणि गळक्या भाजप गोवा सरकारच्या काळात हा विकास आहे.
रवींद्र भवन, काणकोणशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झालेले नुकसान दुरुस्त करण्यासाठी आणि गळती थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.