
पणजी: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत (मनरेगा) काम करणाऱ्या कामगारांना प्रति दिन सर्वाधिक वेतन देण्यात गोव्याचा (३७८ रुपये) देशात तिसरा क्रमांक लागतो. या कायद्यांतर्गत सर्वाधिक वेतन हरियाणात (४०० रुपये) देण्यात येते, तर त्यानंतर सिक्कीम (३८९ रुपये) या राज्याचा क्रमांक लागतो.
केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरात सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागांतील गरीब कुटुंबांना त्यांच्या भागातच काम मिळवून देऊन त्यांचा आर्थिक विकास साधण्याच्या हेतूने केंद्र सरकारने ‘मनरेगा’ योजना कार्यान्वित केले.
देशभरातील लाखो कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेचा लाभ घेत आहेत. गोव्यातही योजनेअंतर्गत काम करणारी हजारो कुटुंबे असून, त्यांना योजनेअंतर्गत प्रति दिन ३७८ रुपये इतके वेतन दिले जाते. गोव्यातील कामगारांना मिळणारे हे वेतन देशात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेतन असल्याचे मंत्री पासवान यांच्या आकडेवारीतून दिसून येते.
गोव्यातील कामगारांना २०२०–२१ मध्ये रु. २८०, २०२१–२२ मध्ये २९४, २०२२–२३ मध्ये ३१५, २०२३–२४ मध्ये ३२२ , २०२४–२५ मध्ये रु.३५६ रुपये देण्यात येत होते. चालू वर्षी २२ रुपये अधिक देत सरकारने हे वेतन ३७८ रुपये केल्याचेही उत्तरातून स्पष्ट होते.
गोव्यासह सर्वच राज्यांतील ग्रामीण भागांतील कुटुंबांनी ‘मनरेगा’चा अधिकाधिक लाभ घेऊन आर्थिक स्थैर्य वाढवावे, यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. त्यासाठी देशभर जनजागृतीही करण्यात येत आहे, असेही मंत्री पासवान यांनी उत्तरात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.