Mahadayi Water Dispute: म्हादई आंदोलनात सर्वपक्षीयांचे सहकार्य मागितले, पण...दीपक ढवळीकर स्पष्टच बोलले

सर्वांनी एकजूट दाखवून वेळीच जर हे आंदोलन यशस्वी केले असते तर आज ही पाळी आली नसती, असे स्पष्ट उद्‍गार मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काढले आहेत.
Mahadayi water dispute
Mahadayi water dispute Dainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: कर्नाटकचा डाव आम्ही आधीच ओळखला होता, त्यामुळेच म्हादई बचाव आंदोलन मगो पक्षाने गेल्या वर्षी सुरू केले. पण या आंदोलनाला इतरांचा पाठिंबा मिळाला नाही. आम्ही सर्वपक्षीयांचे सहकार्य मागितले होते, पण म्हादईच्या प्रश्‍नावर मगोला एकटे टाकण्यात आले, त्यामुळेच आज ही स्थिती उद्‍भवली असून आता सगळेच जागे झाले आहेत.

सर्वांनी एकजूट दाखवून वेळीच जर हे आंदोलन यशस्वी केले असते तर आज ही पाळी आली नसती, असे स्पष्ट उद्‍गार मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना काढले.

म्हादईचे पाणी पळवण्याचा प्रयत्न कर्नाटक बऱ्याच काळापासून करीत आहे. मगो पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. ओपा येथील सप्तकोटेश्‍वर मंदिरापासून म्हादई परिक्रमा सुरू केली आणि म्हादईच्या उगमस्थानी उस्ते येथे म्हादईचे पूजन करून जनजागृती करण्याचा मगो पक्षाने प्रामाणिक प्रयत्न केला.

या प्रयत्नांना मगोप्रेमी आणि कार्यकर्त्यांचे तसेच पर्यावरणप्रेमींचे सहकार्य लाभले, पण इतर राजकीय पक्षांनी मगो पक्षाचा हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे सांगून या आंदोलनात सहभागी होण्यापासून फारकत घेतली, पण आता म्हादईवर कर्नाटकने घाला घातल्याने सगळेच जागे झाले आहेत, असे दीपक ढवळीकर म्हणाले.

आमच्या निवडणूक जाहीरनाम्यावर म्हादईचा विषय होता आणि आताही हा प्रश्‍न न सुटल्यास पुढेही राहील याचा पुनरुच्चार ढवळीकर यांनी केला.

आता हीच वेळ आली आहे, सर्वांनी संघटीत होण्याची आणि सत्ताधारी भाजप सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांना गोवा आणि म्हादईचे नाते यासंबंधी सविस्तर पटवून देण्याची आवश्‍यकता आहे. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळेच म्हादईवरील संकट दूर होणे शक्य होईल आणि तसे झाले तरच म्हादईवरील घाला आपण रोखू शकू, नपेक्षा हातातोंडाशी आलेले म्हादईचे पाणी कर्नाटक आपल्या राज्यात पळवून गोव्याला पाण्यापासून वंचित करील आणि आपण पाण्यासाठी वणवण फिरू हे नक्की.

Mahadayi water dispute
Kalasa Cannal: कळसा प्रकल्पामुळे समुद्राचा खारटपणा वाढणार

म्हादईच्या पाण्यावर अर्धाअधिक गोवा पोसतो आहे, त्यामुळे म्हादईचे पाणी कर्नाटकने पळवले, तर गोव्यातील दूधसागर, खांडेपार तसेच मांडवी नदीवरही विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. गोव्यात दोन खासदार आणि कर्नाटकात सत्तावीस खासदार हे समीकरण न धरता, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे, हेच लक्षात घेऊन केंद्र सरकारने म्हादईवरील कर्नाटकचा घाला त्वरित रोखला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com