
मडगाव: बोरी येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या आराखड्याला लोटली भागातून सध्या मोठा विरोध होत असून भोम येथील बगल रस्त्याचाही आराखडा बदलावा अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही प्रश्न दिल्लीत संसदेच्या व्यासपीठावर आणून संपूर्ण देशाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण करणार आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी दिली.
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यापासून सुरू होत आहे. गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि त्याचा स्थानिक मच्छीमारांवर झालेला परिणाम हाही प्रश्न आपण लोकसभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले. हे प्रश्न जरी स्थानिक महत्त्वाचे असले, तरी देशाचेही लक्ष या प्रश्नांकडे वळविण्याइतके ते गंभीर आहेत, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
नवीन बोरी पूल बांधण्यासाठी सध्या जी जागा निश्चित केली आहे, ती खाजन शेतजमिनीची आहे. या शेतीवर कित्येक स्थानिकांचा उदरनिर्वाह चालू आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे कॅ. फर्नांडिस म्हणाले.
एका बाजूने हे सरकार खाजन जमिनीचा ऱ्हास होणार म्हणून भोम बगलरस्ता पर्यायी मार्गाने नेण्यास तयार नाही, तर दुसऱ्या बाजूने बोरीच्या पुलासाठी खाजन शेतजमिनीचाच वापर करू पाहात आहे.
यातून सरकारचा दुटप्पीपणा स्पष्ट होतो, असे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.
कॅ. फर्नांडिस म्हणाले, यापूर्वी मागच्या अधिवेशनात मी पर्वरीच्या राखणेश्वर देवालयाचा प्रश्न लोकसभेच्या चर्चेत आणला होता आणि या समस्येची संसदेने त्वरित दखल घेत त्यावर उपाय घेण्याचे आश्वासन दिले होते. बोरी पुलाचा आराखडा आणि भोम बगलरस्ता या दोन्ही प्रश्नांसंदर्भात यापूर्वीच मी राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना एका पत्राद्वारे कळविले आहे. या अधिवेशनात गोव्याच्या या प्रश्नाबद्दल इतर राज्यातील खासदारांचे लक्ष वेधण्याचा आपला प्रयत्न असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.