पणजी, भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक हे बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. बहुजन समाजाकडेही त्यांनी फारसे गांभीर्याने कधीच पाहिले नाही. भाजप केवळ निवडणुकीच्या वेळीच बहुजनांची चिंता व्यक्त करतो.
भाजपच्या डावपेचांना बळी न पडता त्यांच्या उमेदवारांचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांना निवडून देण्याचे आवाहन भंडारी समाजातील नेत्यांनी संयुक्तपणे रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत केले.
कांपाल येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर, अमरनाथ पणजीकर, उदय च्यारी, नीलेश च्यारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश भोसले, शरद चोपडेकर, माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, धर्मा चोडणकर, प्रदीप नाईक, वीरेंद्र शिरोडकर ‘आप’चे गोवा संयोजक ॲड. अमित पालयेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
श्रीपाद नाईक यांना भाजपमध्ये मान नाही. ते मनोहर पर्रीकर यांच्यापेक्षा ज्येष्ठ असतानाही भाजपने नाईक यांना गोव्याचे मुख्यमंत्री का केले नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. गिरीश चोडणकर म्हणाले, श्रीपाद नाईक हे भाजपमधील मोठे नेते आहेत; पण पक्षात त्यांना किंमत नाही. भाजपचे राजकारण समजून घेतले पाहिजे.
त्यांनी कधीच नाईक यांना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली नाही. त्यांची पक्षात किंमत नसल्यामुळेच ते आपल्या मुलालाही विधानसभेची उमेदवारी मिळवून देऊ शकले नाहीत.
अविनाश भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपचे इतर नेते लोकांमध्ये काँग्रेस अल्पसंख्याकांना ओबीसीचा वाटा देईल, अशी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती आणि धर्मावरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला पराभूत करून लोकशाहीचे रक्षण केले पाहिजे.
लोकसभेत प्रश्न मांडण्यात अपयश
श्रीपाद नाईक बहुजन समाजाचे प्रश्न लोकसभेत हिरिरीने मांडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते त्यात अपयशी ठरले आहेत. भाजप तरुणांना नोकऱ्या देण्यातही मागे राहिला आहे. आरक्षण असले तरी आमच्या तरुणांना नोकरी मिळत नाही. दीपक पाऊस्कर हे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नोकरीत घोटाळा झाल्याचा आरोप आमदार आतानासिओ मोन्सेरात यांनी केला होता. मात्र, भाजपने आता त्यांना मतांसाठी वेठीस धरले आहे, असे ॲड. अमित पालयेकर यांनी नमूद केले.
...ही तर आरक्षण संपवण्याची प्रक्रिया
राज्यातील बहुजन समाजाशी नाते जोडले ते रमाकांत खलप यांनी. बहुजन समाजाला त्यांनी अल्पावधीच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या काळात न्याय देण्याचे काम केले आहे. भाजप आणि आरएसएसची विचारधारा बहुजन समाजाच्या विरोधात आहे.
आरएसएसला आरक्षण संपवायचे आहे. त्यांनी ही प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. मात्र, निवडणुकीच्या वेळी ते बहुजन समाजाविषयी खोटी आत्मीयता दाखवतात. त्यामुळे लोकांनी हा फसवेपणा लक्षात घ्यावा, असे आवाहन चोडणकर यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.