
Cuncolim industrial pollution
मडगाव: कुंकळ्ळीच्या जनतेच्या हितासाठी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेले प्रदूषण करणारे सर्व कारखाने कायमचे बंद करा, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिले आहे. कुंकळ्ळीच्या लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या,असेही पत्रात म्हटले आहे.
कुंकळ्ळीच्या लोकांना चांगले पर्यावरण देण्यासाठी भूजलाचे सर्वेक्षण आणि भूगर्भातील पाण्याचे निरीक्षण यासह अनेक उपाययोजना कराव्यात, असेही आलेमाव यांनी बुधवारी पत्रात म्हटले आहे.
कुंकळ्ळीचे आमदार असलेल्या आलेमाव यांनी, आपल्या पत्रात कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील घातक कचरा, वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण व्यवस्थापित करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
‘पोलाद आणि फिश मिल उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे औद्योगिक वसाहतीच्या परिसरात राहणाऱ्या कुंकळ्ळीवासीयांच्या आरोग्याच्या समस्यांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. फिश मील आणि स्टीलचे विविध उद्योग असलेली कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत प्रभावी कचरा व्यवस्थापन यंत्रणेचा अभाव आणि बंद असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे हॉटस्पॉट बनली आहे,’ असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
ते म्हणतात की, भाजप सरकार स्वताच्या योग्यराजकारणासाठी प्रदूषक घटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन पाळण्यात अपयशी ठरले आहे. ‘ ६ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विधानसभेत कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाविरोधात दोन महिन्यांत कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप प्रदूषण रोखण्यास कोणतीही पावले उचलण्यात संबंधित विभाग अपयशी ठरले आहेत.
‘‘वातावरणातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणे, कुंकळ्ळी आयडीसीसाठी वास नियंत्रण अभ्यास करणे, रिअल-टाइम एम्बियंट एअर मॉनिटरिंग स्टेशन स्थापित करणे, धोकादायक कचरा डम्पिंग नमुन्यांची तपासणी करणे आणि पर्यावरणीय नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कुंकळ्ळी आयडीसी आणि आजूबाजूच्या भूजल आणि पृष्ठभागावरील पाण्याचे निरीक्षण करणे, या युरी आलेमाव यांनी सुचविलेल्या काही उपाययोजना आहेत. कुंकळ्ळी आयडीसीत नवीन फिश मिल प्लांट येऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘आश्चर्याची बाब म्हणजे सील करण्यात आलेल्या प्रदूषणकारी कारखान्यांना पर्यावरण नुकसान भरपाई लादून आणि अटी घालून अल्पावधीतच काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यांनी अटींचे पालन करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत का, हे तपासण्याची गरज आहे. कुंकळ्ळीमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. जनतेच्या हितासाठी हे सर्व प्रदूषण करणारे कारखाने कायमस्वरूपी बंद करावेत, असेही युरी आलेमाव म्हणतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.