
पर्वरी: गोव्यात बैलांच्या झुंजींना (धिरयो) कायदेशीर करण्यासाठी कायदा करावी, अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार जीत आरोलकरांनी केली. आरोलकरांनी शून्य काळानंतर मांडलेल्या लक्षवेधीतून ही मागणी केली. तामिळनाडूतील जलिकट्टू'च्या धर्तीवर राज्यातील ‘धिरयो' देखील कायदेशीर करावा, असे मत आरोलकरांनी मांडली.
बैलांच्या झुंजीची प्रथा हडप्पा काळापासून सुरु आहे. किनारी भागात याबाबत मोठी आस्था आहे. या भागातील नागरिक वासरांची अधिक काळजी घेतात. संविधानाच्या कलम २९ वाचून दाखवत या लक्षवेधीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा द्यावा, असे मत आरोलकरांनी सभागृहात मांडले. यामुळे राज्यात पर्यटन देखील वाढेल, असा दावा त्यांनी केला.
धिरयोचा विषय भावनिक असून, तो गांभीर्याने घ्यावा. बॉक्सिंग, कुस्ती यासारखे खेळ आपल्याला चालतात पण, जनावरांच्या झुंजी का चालत नाहीत? असा सवाल देखील आरोलकरांनी उपस्थित केला.
आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी जीत आरोलकरांच्या लक्षवेधीला समर्थन दिले. तसेच, यापूर्वी अनेक आमदरांनी हा मुद्दा विधानसभेत मांडल्याचे नमूद केले. शिवाय २०२३ मध्ये त्यांनी मांडलेल्या खासगी विधेयकचा संदर्भ दिला. बैलाला घरगुती प्राणी म्हणून मान्यता देऊन त्यानंतर कायदेशीर पद्धतीने धिरयोला देखील मान्यता मिळवून द्यायला हवे, असे व्हिएगस म्हणाले.
किनारी भागात कोंबडे, रेडे आणि बैलांची झुंज चालत होती, असे वीरेश बोरकर म्हणाले. जलिकट्टूला देखील असाच विरोध झाला पण, सर्वांनी एकत्र येऊन कायदा केला. तसेच, महाराष्ट्र आणि कर्नाटकात देखील बैलांचे खेळ सुरु आहेत, असे म्हणत बोरकरांनी देखील या लक्षवेधीला समर्थन दिले.
दिलायला लोबोंनी देखील लक्षवेधीला समर्थन देताना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले. विजय सरदेसाईंनी स्पेन, बार्सिलोनामध्ये बैलांची झुंज अधिकृत असल्याचे नमूद केले. आणि खऱ्या अर्थाने हा खेळ पर्यटकांसाठी आकर्षित करणारा आहे, असे सरदेसाई म्हणाले. धिरयोला कायदेशीर करण्याची सुरुवात सभागृहातून व्हायला हवी, असे सरदेसाई म्हणाले.
विरोधी पक्षनेते यांनी धिरयोचा विषय निवडणुकीचा मुद्दा होऊ नये असे मत मांडले. लक्ष्मीकांत पार्सेकर, मनोहर पर्रीकरांनी यासाठी सकारात्मकता दर्शवली होती, या सरकारची काय भूमिका आहे? असे मत आलेमाव यांनी मांडले.
रुडॉल्फ फर्नांडिस, अंतानियो वाझ, कार्लुस आणि आलेक्स लॉरेन्स यांनी देखील जीत यांच्या लक्षवेधीला समर्थन दिले.
मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले?
सर्वांनी सभागृहात जलिकट्टूचा संदर्भ दिला यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी तामिळनाडूतील हा खेळ बैलांची झुंज नव्हे तर त्यांच्या खांद्याला घरून बाहेर ओढण्याचा खेळ आहे. गोव्यात धिरयो होत होता पण, नंतर त्यावर बंदी घालण्यात आली.
सगळ्यांची भावना धिरयो सुरु करण्याची आहे पण, यासाठी कायदेशीर गोष्टींचा विचार करुन यासाठी काय करता येईल, त्याचा विचार सरकार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.