
पणजी: पावसाळी अधिवेशनात राज्यातील पर्यटनस्थळांवरील काच आणि प्लास्टिक कचरा तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवनामुळे पर्यटकांना होणाऱ्या दुखापतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.आमदार मायकल लोबो यांनी ही समस्या तीव्रतेने मांडली, तर पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजनांची ग्वाही दिली.
गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी सुंदर आठवणींचा स्रोत असले तरी, तुटलेल्या बाटल्या आणि प्लास्टिक कचरा यामुळे अनेक किनाऱ्यांवर पर्यटकांना होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण वाढले आहे. आमदार मायकल लोबो यांनी हा मुद्दा उपस्थित करत, पर्यटन विभाग किनारा स्वच्छतेवर मोठा खर्च करत असतानाही, बाटल्या आणि प्लास्टिकवर किनाऱ्यांवर बंदी घालण्याचा विचार करणार का? असा प्रश्न विचारला.
"पर्यटन खात्याकडून समुद्र किनाऱ्याची सफाई करण्यासाठी कर्मचारी नेमले असले तरी, हा मुद्दा केवळ स्वच्छतेचा नाही तर शिस्तीचा देखील आहे," असे नमूद करत पर्यटनमंत्री आणि गृहमंत्री दोघांनी याकडे लक्ष देण्याची मागणी लोबोंनी केली.
मंत्री खंवटे यांनी विधानसभेत या समस्येवर चिंता व्यक्त करत सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे ही एक गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे काचेच्या बाटल्या फुटून पर्यटकांना दुखापत होत आहे. यावर उपाय म्हणून, अशी प्रकरणे टाळण्यासाठी सरकारने बिअरच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रणाली लागू केली आहे.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी गोव्याच्या किनारी भागाच्या स्वच्छतेबाबत नवीन कराराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ८२.२ किमी लांबीच्या ५० समुद्रकिनाऱ्यांचा आणि १०२ 'डेड एंड्स'चा नव्या किनारा स्वच्छता करारामध्ये समावेश करण्यात आला आहे. १ मार्चपासून या कामासाठी ५२५ कर्मचाऱ्यांना विविध पाळ्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. तसेच, या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या स्वयं-सहायता गटांना संधी द्यायला सरकार तयार असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
पुढे आमदार मायकल लोबो यांनी समुद्रकिनाऱ्यापासून ५० मीटरच्या आत असलेल्या बिअरच्या दुकानांमध्ये काचेच्या बाटल्यांमध्ये दारू विक्रीवर बंदी घालता येईल का, असा प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर दिले की, "किनारी भागांमध्ये काचेच्या बाटल्यांचा वापर पूर्णपणे बंद करता येईल किंवा त्याऐवजी कॅनमध्ये बिअर विक्रीचा पर्याय देता येईल का, याची सरकारकडून तपासणी केली जाईल."
अधिवेशनातील चर्चेनुसार आता नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. सर्व पर्यटन स्थळांवरआणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास आणि काचेच्या बाटल्या फोडण्यास बंदी घालण्यात आली असून मोकळ्या जागांवर दारू पिणे आणि बाटल्या फोडणे हा आता गुन्हा मानला जाईल. या गुन्हेगारांना ५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल किंवा भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २२३ नुसार कारवाई केली जाईल, असेही मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.