

कोकण फिरायला जाणाऱ्या आणि समुद्रातील साहसी खेळांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्याचे आगमन जवळ येत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध मालवण बंदर परिसरात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा (Water Sports) सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मान्सूनच्या काळात समुद्रातील वाढती खळबळ आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
सागरी मंडळाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, २६ मे ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मालवण बंदर क्षेत्रातील सर्व पर्यटनविषयक उपक्रम पूर्णपणे बंद राहतील. यामध्ये ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जाणारी प्रवासी बोट वाहतूक, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि समुद्रकिनाऱ्यावरील विविध प्रकारच्या गतीमान वॉटर स्पोर्ट्सचा समावेश आहे.
प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन एस.टी. उगालमुगले यांनी मालवण परिसरातील सर्व बंदर निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 'इनलँड व्हेसल्स ॲक्ट, ११९७' अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक बोटींना या काळात समुद्रात न उतरण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
मालवण बंदर विभागाने या आदेशाची तातडीने अंमलबजावणी सुरू केली असून, क्षेत्रातील एकूण ३१ पर्यटन सोसायट्या, संस्था आणि वैयक्तिक बोट चालकांना अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, चिवला बीचवरील शिवशक्ती जलपर्यटन संस्था तसेच तारकर्ली, देवबाग आणि दांडी येथील बोटिंग संघटनांचा समावेश आहे. स्थानिक स्कूबा डायव्हिंग चालकांनाही नियम न तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यात समुद्र रौद्ररूप धारण करतो, ज्यामुळे पर्यटकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणूनच ही बंदी घालण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून कोकणातील सागरी पर्यटन थांबवले जाते. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये २० मेपासूनच हा हंगाम बंद करण्यात आला होता, मात्र यंदा २६ मेपासून ही बंदी लागू होत आहे.
सध्या चालू उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामाचा हा शेवटचा टप्पा असल्याने, मालवणच्या दांडी किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बंदी लागू होण्यापूर्वी पर्यटकांनी समुद्र सफारीचा आनंद लुटला. आता हवामानातील बदल आणि पावसाळी वातावरणाचा अंदाज घेत पुढील तीन ते चार महिन्यांसाठी हे जलपर्यटन पूर्णपणे बंद राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.