

खांडोळा: प्रश्नांचा भडीमार, पर्यावरणाच्या ऱ्हासावर संताप, विकासकामांबाबत संशय आणि पंचायतीच्या कारभारावर कडाडून टीका अशा वातावरणात बेतकी-खांडोळा ग्रामसभा पार पडली. वृक्षतोडीपासून कचरा व्यवस्थापनापर्यंत अनेक विषयांवर ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगलेच घेरले; मात्र सरपंचांच्या मौनामुळे सभेतील चर्चेला वेगळेच वळण लागले.
सरपंच श्रद्धा फडते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. यावेळी पंच विशांत नाईक, संजीवनी तळेकर, शेखर घाडी, निकिता फडते, मनोज गावकर, रमिता गावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
तळेवाडा परिसरात बागायतीच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोड व डोंगर सपाटीकरणाच्या कामावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला.
निसर्गाचे रक्षण करणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. तळेवाडा परिसरातील वृक्षतोड आणि डोंगर सपाटीकरण हा पर्यावरणासाठी गंभीर इशारा आहे. केवळ ग्रामपंचायतीनेच नव्हे, तर वन, महसूल आणि इतर संबंधित शासकीय विभागांनीही याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी मधू गावकर यांनी यावेळी केली.
बागवाडा येथे सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निवासी प्रकल्प उभारण्याच्या हालचालींनाही ग्रामस्थांनी विरोध केला. तामसुली येथील गणेश विसर्जन तळ्याच्या तुटलेल्या लोखंडी कठड्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेले रस्ते सहा महिन्यांनंतरही पूर्ववत न झाल्याने अपघातांचा धोका वाढल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली. देवळाय-खांडोळा येथील पारंपरिक विहीर दुरुस्त करावी, अशी मागणी संतोष परब यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.