

पणजी: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवांच्या विस्ताराला पुन्हा एकदा धक्का बसण्याची चिन्हे दिसत असून, इंडिगोने आपल्या हिवाळी २०२६ वेळापत्रकात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दाबोळीला चालविण्यात येणारी ‘एटीआर’ विमानसेवा समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे नवी मुंबई-दाबोळी ही प्रादेशिक जोडणी सेवा बंद होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.
विशेष म्हणजे, दाबोळीहून कोइम्बतूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ‘एटीआर’ सेवाही इंडिगोच्या आरक्षण प्रणालीतून उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळावरून प्रादेशिक पातळीवरील आणखी काही हवाई जोडण्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंडिगोने २५ ऑक्टोबरपासून नवी मुंबई विमानतळावर आपली ‘एटीआर’ विमाने तैनात ठेवण्याचे नियोजन केले आहे. या विमानांद्वारे अहमदाबाद, राजकोट, कोल्हापूर, भावनगर आणि दीव यांसारख्या शहरांना प्रादेशिक सेवा देण्यात येणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई केंद्रातून ‘एटीआर’ विमानांच्या माध्यमातून दाबोळीला जोडण्याऐवजी अन्य प्रादेशिक मार्गांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे हिवाळी वेळापत्रकावरून स्पष्ट होत आहे.
‘दाबोळी’वरील सेवांकडे लक्ष
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सेवांचा विस्तार होत असताना विमान कंपन्या आपल्या प्रादेशिक मार्गांचे पुनर्रचनेचे धोरण अवलंबत आहेत. त्याचा परिणाम गोव्याच्या दाबोळी विमानतळावर जाणवू लागला आहे. आगामी हिवाळी वेळापत्रकात दाबोळीवरून आणखी कोणत्या सेवा कमी होतात किंवा त्याऐवजी नवीन सेवा सुरू होतात, याकडे आता प्रवासी आणि विमान वाहतूक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.