
वाळपई: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना जनतेच्या मताचा, धर्मनिरपेक्षतेचा, स्त्रियांच्या सन्मानाचा आणि आदर्श प्रशासनाचा ठसा उमटवला. आजचे युवक जर त्यांचे विचार आचरणात आणतील, तर खरे परिवर्तन घडू शकते, असे होंडाचे सरपंच शिवदास माडकर यांनी सांगितले.
होंडा येथे पंचायत भवनासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळास्थानी सोमवार, ९ रोजी (तिथीनुसार) शिवरायांचा राज्याभिषेक दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती व ग्रामपंचायत होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पवृष्टी व अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या निनादात व जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमास सरपंच शिवदास माडकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबुली वाळके, सचिव देऊ माईणकर, रामा गावस, मनोज नाईक, रामा सातार्डेकर, संतोष नावेलकर, ओंकार पाटील, उदय तामसे, धाकू पावने, शुभम गावकर, शानी नाईक, तुकाराम गावकर, प्रेमनाथ गावडे, गौरीशंकर घाडी, शिवा चव्हाण, अल्बर्ट परेरा, प्रशांत नाईक व इतर शिवभक्त उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. त्यांनी एका स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची घोषणा करून दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवला. राज्याभिषेक म्हणजे फक्त एका राजाचा राज्यारोहण समारंभ नव्हता, तर जनतेच्या हक्कांचे, स्वातंत्र्याचे आणि न्यायाचे राज्य सुरू होण्याची घोषणा होती, असे सरपंच माडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.