
पणजी: गोविंद गावडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केल्याने भाजप संघटनात्मक पातळीवर तसेच सरकारात शिस्तीचा संदेश गेला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे बळ वाढले असून, मंत्रिमंडळ पुनर्रचनेकडे मंत्री, आमदारांचे लक्ष लागले आहे. दिगंबर, मायकल, तवडकर समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
‘गोविंद गावडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा निर्णय माझा स्वतःचा होता’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज ठामपणे सांगितले. गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सावंत यांनी हे उत्तर दिले.
मात्र, आणखी कोणा मंत्र्यास हटवण्याबाबत अद्याप काही ठरलेले नाही, असे सांगून त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत उत्सुकता आणखी वाढविली आहे. दरम्यान, ‘मी जो मंत्री आहे तो मुख्यमंत्र्यांच्या इच्छेने’, असे बाबूश यांनी विधान करून डॉ. सावंत यांचे वजन व अधिकार अधोरेखित केला. तसेच अनेकांनी आज सावध प्रतिक्रिया दिल्या.
मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचा निर्णय मी स्वतः घेतला, हे सांगताना त्यांनी गावडे यांच्याविषयी किंवा मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी अधिक स्पष्ट बोलण्यास नकार दिला. त्यामुळे गावडे यांच्या जागी नवीन मंत्री म्हणून कोणाला घेणार, हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे स्पष्ट झाले.
मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याचे वारंवार सांगितले गेले. त्यास मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी दुजोरा दिला. मात्र, निश्चित वेळ आणि तारीख काही त्यांनी सांगितली नव्हती.
गावडे यांना हटवल्यानंतर आणखी काही मंत्र्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असल्याचे दिसू लागले आहे. गावडे गेले, आता कोणाचा नंबर अशी विचारणा सध्या राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला हटवायचे, हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे.
मंत्री गावडे यांना हटविल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, भाजपमध्ये योग्यवेळी योग्य निर्णय होतात. भाजप आणि संघटनेविषयी मी उत्तरे देईन; परंतु सरकारविषयी निर्णय मुख्यमंत्री घेतात. मंत्रिमंडळात कोणता नवा चेहरा पहायला मिळेल, अशी विचारणा केली असता दामू यांनी ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल’, असे सांगितले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल म्हणाले, की सध्याच्या स्थितीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. मुख्यमंत्री आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील.
गावडे यांना वगळल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाष्य करण्यास नकार दिला. कारवाईस विलंब लागला का असे विचारले असता, माझ्याकारकिर्दीत ढवळीकरांना एका दिवसात हटविल्याच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.