

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत यंदा मतदानाचा टक्का वाढला. सरकारची ‘माझे घर योजना’ प्रभावी ठरली, त्याचबरोबर अनेक मतदारसंघात नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसारखा प्रचार केला, शक्तीप्रदर्शन केले.
त्यात काँग्रेस, भाजप, गोवा फॉरवर्डसह काही अपक्षांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ५६.८६ टक्के मतदान झाले होते, त्यात यंदा विक्रमी भर पडत ७०.८१टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी भाजपच्या आक्रमक प्रचारामुळेही टक्का वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे निकालावर भाजपची छाप दिसेल की विरोधकांची? याचे उत्तर सोमवारच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत एकूण २२६ उमेदवार रिंगणात होते. त्यात उत्तर गोव्यातील १११ आणि दक्षिण गोव्यातील ११५ उमेदवारांचा समावेश होता.
जिल्हा पंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर होत असल्याने भाजप, काँग्रेस, आप, मगो, गोवा फॉरवर्ड, आरजीपी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भाजपने ४० उमेदवार रिंगणात उतरवले, मगोला तीन जागा दिल्या व काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा दिला.
या रणांगणात इतर सात पक्षांच्या काही उमेदवारांनी अवघ्याच ठिकाणी भाजपसमोर आव्हान उभे केले. कारण विरोधकांत एकजूट न झाल्याने भाजपचे पारडे अनेक ठिकाणी वरचढ झाले. शिवाय मगोच्या बालेकिल्ल्यात प्रियोळ, फोंड्यात भाजपला मगोच्या अपक्षांनीच धक्का दिला. त्यामुळे तेथे निवडले जाणारे विरोधकही भाजपचेच समर्थक ठरणार आहेत.
गत जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने दोन्ही जिल्ह्यात स्पष्ट बहुमत मिळवले होते. यंदाही वाढलेल्या टक्केवारीमुळे भाजपचेच पारडे जड होण्याची शक्यता आहे.
सत्तरी, पाळी, डिचोलीतील वाढलेला टक्का भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आपल्या विजयाचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात झालेले मतदान काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी फाटाफुटीचा लाभ होण्याचीही शक्यता आहे.
विरोधकांची युती सक्षम झाली नाही. त्यामुळे आरजी, आपने एकला चलोचे धोरण स्वीकारले. त्यामुळे कॉंग्रेससोबत युती न करण्याचा निर्णय ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना लाभदायक ठरणार आहे. दक्षिणेत आपचाही प्रभाव जाणवला.
काँग्रेस-गोवा फॉरवर्डची युती झाली, पण काही ठिकाणी युतीचा उमेदवार असून विरोधात उमेदवार त्यांनी ठेवल्यामुळे भाजपलाच त्याचा फायदा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
गोवा फॉरवर्ड, आपचा आक्रमक प्रचार सुरू होता. सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू होती, पण भाजपच्या ‘माझे घर’ योजनेमुळे ग्रामीण भागात त्याचा विशेष प्रभाव पडला. त्याउलट काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचा अभाव जाणवत होता. काही उमेदावारांसोबत मोजकेच कार्यकर्ते दिसत होते. त्यामुळे ते प्रचारात कमी पडले, असे ज्येष्ठ मतदारांचे मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.