

पणजी: सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना संपूर्ण राज्यात सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून थंडीचा जोर वाढला असून, पहाटे आणि रात्रीच्या वेळी वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात मोठी चढ-उतार पाहायला मिळत असून पारा १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. यामुळे जनजीवनावर थंडीचा स्पष्ट परिणाम दिसून येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या किमान तापमानात सध्या कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी तापमानाचा पारा १९ अंशांवर स्थिरावला होता, मात्र अचानक त्यात घट होऊन तो १८ अंशांपर्यंत खाली आला आहे.
या बदलत्या हवामानामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. डोंगराळ आणि ग्रामीण भागात थंडीची तीव्रता शहरांच्या तुलनेत अधिक जाणवत आहे.
गोवा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात थंडीची ही लाट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीचा प्रभाव ओसरण्याऐवजी तो अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, किमान तापमान १९ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात ही घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने राज्यात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर आणि पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका वाढत असल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे.
वृद्ध आणि लहान मुलांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे. थंडीच्या या तीव्र प्रभावामुळे शेतीवर आणि काही पिकांवर परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.