

पणजी: राज्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने मागील आठवड्यापासून थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने सकाळी आणि रात्रीच्या वेळेत नागरिकांना थंडीचा अधिक त्रास जाणवत आहे. विशेषतः पहाटेच्या सुमारास थंड वाऱ्यांमुळे हुडहुडी भरविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी राज्यात यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्या वेळी किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात थोडी वाढ होऊन किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात मोठा बदल होण्याची चिन्हे नसली तरी थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहणार असल्याने थंडीची तीव्रता जाणवत राहील.
राज्यातील सर्वच भागांत रात्री थंडीचा जोर वाढला असून घाटालगतच्या भागांत ही थंडी अधिक जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, उबदार कपड्यांचा वापर करावा आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.