Ujjwala Scheme: 'उज्ज्वला'सह सर्व सरकारी योजना सुरूच राहणार! मुख्यमंत्री सावंतांनी अफवांना लावला पूर्णविराम; गृह आधार, दयानंद योजनेचाही लाभ मिळणार

Goa Ujjwala Scheme Latest Update: विरोधकांकडून अन्य योजनांचा लाभ बंद होणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप करत या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Goa Ujjwala Scheme Latest Update
Ujjwala SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळावेत, यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वार्षिक तीन हजार रुपये थेट जमा करणारी ‘गोवा उज्ज्वला योजना’ सरकारने सुरू केली असली, तरी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे लाभार्थ्यांना अन्य कोणत्याही सरकारी योजनेपासून वंचित केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडून अन्य योजनांचा लाभ बंद होणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप करत या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘गोवा उज्ज्वला योजने’च्या अर्जामध्ये अर्जदार अन्य कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहे का, अशी विचारणा करण्यात येत असल्याने अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विरोधकांनी याच मुद्द्याचा आधार घेत सरकारकडून अन्य योजनांचा लाभ बंद केला जाणार असल्याची चर्चा सुरू केली. त्यामुळे सरकारला या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले असून, मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

Goa Ujjwala Scheme Latest Update
Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, भाजप सरकारने एकदा लागू केलेली कोणतीही योजना मागे घेतलेली नाही. त्यामुळे ‘गोवा उज्ज्वला योजने’चा लाभ घेतल्याने गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना किंवा अन्य कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ बंद केला जाणार नाही. उलट, या योजनांचे लाभ घेत असलेल्या नागरिकांना ‘गोवा उज्ज्वला योजने’चाही लाभ घेता येणार आहे.

अर्ज भरताना अर्जदार अन्य योजनेचा लाभार्थी आहे की नाही, याची माहिती घेण्यामागे वेगळा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या नागरिकांच्या बँक खात्याची माहिती सरकारी यंत्रणेकडे आधीपासून उपलब्ध असल्याने त्यांना तीन हजार रुपयांची लाभाची रक्कम थेट आणि तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गृह आधार किंवा दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी ‘गोवा उज्ज्वला योजने’चा अर्ज भरल्यास त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया तुलनेने जलद होईल.

दरम्यान, ‘गोवा उज्ज्वला योजना’ केवळ एका वर्षासाठी लागू केली योजना नसून ती पुढेही सुरू ठेवली जाणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. सरकारने अन्य कोणत्याही कल्याणकारी योजना बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एका योजनेचा लाभ घेतल्यामुळे दुसऱ्या योजनेपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती लाभार्थ्यांनी बाळगण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

Goa Ujjwala Scheme Latest Update
Goa Beach Shacks: तब्बल 450 शॅक होते, नोंदणीविनाच! शॅकवरही पर्यटन खात्याचा अंकुश; नोंदणी आता अनिवार्य

रक्कम जलद जमा करण्याचा उद्देश

अन्य कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेणाऱ्या अर्जदाराला आपल्या बँक खात्याचा तपशील योजनेशी जोडावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभाची रक्कम खात्यावर जमा करता येणार असल्याने अशा लाभार्थ्यांना पैसे मिळण्यासाठी किमान चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे अर्जातील अन्य योजनांच्या लाभाबाबतचा प्रश्न हा कोणताही लाभ काढून घेण्यासाठी नसून, लाभाची रक्कम जलदगतीने खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक माहिती मिळविण्याच्या उद्देशाने आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

विरोधकांकडे सरकारविरोधात मुद्देच नाहीत

१ विरोधकांकडे सरकारविरोधात ठोस मुद्देच उरले नसल्याने केवळ अफवा पसरविण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. ‘गोवा उज्ज्वला योजने’बाबत निर्माण केलेला संभ्रम हा त्याच अफवांचा भाग आहे. सरकारने नागरिकांच्या हितासाठी ही योजना सुरू केली असून, लाभार्थ्यांना वर्षाला तीन सिलिंडरच्या खर्चासाठी तीन हजार रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे.

२ ‘उज्ज्वला’चा लाभ घ्या आणि इतर योजना गमवा’, अशी स्थिती नसून ‘उज्ज्वला’सह अन्य योजनांचाही लाभ सुरूच राहणार, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे. गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना अथवा अन्य योजनांचे लाभार्थी असलेल्या नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता ‘गोवा उज्ज्वला योजने’चा अर्ज करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Goa Ujjwala Scheme Latest Update
Goa Medical Act: गोवा वैद्यकीय हिंसाचार कायद्याचे कलम 7 घटनात्मक आहे का? उच्च न्यायालयात आव्हान; राज्य सरकारला उत्तरासाठी 3 आठवड्यांची मुदत

अर्जवाटपावरून पंचाला मारहाण

फोंडा : बांदोड्याचे पंचसदस्य रामचंद्र नाईक यांना विजेश नाईक याने मारहाण केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार आज (मंगळवारी) दुपारी घडला. बांदोडा पंचायतीत उज्ज्वला योजनेचे अर्जवाटप सुरू असताना रामचंद्र नाईक व विजेश नाईक या दोघांत बाचाबाची झाली. विजेशने रामचंद्र यांच्यावर हात उगारला. झटापटीवेळी रामचंद्र यांच्या हाताला खिडकीची काच लागल्याने दुखापत झाली. त्यांना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात, नंतर गोमेकॉत दाखल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com