
पणजी: गोव्याच्या पर्यटन उद्योगासाठी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्याचे प्रमुख विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर गंभीर आरोप केला की, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या गोव्याला त्यांच्या व्यवसाय यादीतून वगळत असून त्याऐवजी इतर राज्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे राज्याच्या पर्यटनावर आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच एअर इंडियाने 2025-26 च्या हिवाळ्या मोसमासाठी लंडन गॅटविक नेटवर्कमधून गोव्याला वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आलेमाव म्हणाले की, सरकारने गोव्याला (Goa) पुन्हा स्पर्धात्मक आणि पर्यटनासाठी आकर्षक बनवण्यासाठी आपल्या धोरणांचे तातडीने पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे.
आलेमाव यांनी सरकारच्या दुहेरी विमानतळ धोरणावरही कठोर टीका केली. "राज्यात दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ पर्यटनाला मोठी चालना देतील, असा दावा सरकारने वारंवार केला. पण सध्याची परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. एअरलाईन्स कंपन्या त्यांच्या नेटवर्क सूचीमधून गोव्याला बाहेर काढत असून इतर राज्यांना प्राधान्य देत आहेत," असे ते म्हणाले.
आलेमाव यांनी पुढे असाही आरोप केला की, गोवा सरकार 'दाबोळी विमानतळाचे 'घोस्ट' विमानतळात (Ghost Airport) रुपांतरण करण्याचा' प्रयत्न करत आहे. त्यांच्या मते, पर्यटनाचे चित्र सध्या धूसर आणि अनिश्चित दिसत आहे. "सरकारला त्यांच्या धोरणांमध्ये आणि राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यामध्ये पूर्णपणे अपयश आले आहे. सरकार फक्त कर्ज घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, ना की उत्पन्न निर्माण करण्यावर नाही," अशी थेट टीकाही आलेमाव यांनी केली.
दाबोळी विमानतळ हे गोव्याच्या दक्षिण भागातील लोकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र असून त्याला दुर्लक्षित केल्याने स्थानिक व्यवसायांवरही परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
आलेमाव यांनी पर्यटन (Tourism) विभागाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "पर्यटन विभाग परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, रोडशो आणि विविध दौऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करतो. मात्र, या प्रयत्नांमुळे कोणतेही सकारात्मक परिणाम दिसत नाहीत. आम्ही असे अनेक उदाहरणे पाहिली, जिथे रोडशो आणि कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही त्या देशांमधून अपेक्षित पर्यटक गोव्यात आलेले नाहीत."
या प्रकारच्या खर्चाला आलेमाव यांनी 'सार्वजनिक निधीची उधळपट्टी आणि लूट' असे संबोधले. त्यांच्या मते, परदेशातील महोत्सवांमध्ये गोव्याची जाहिरात करण्यापेक्षा, राज्यातील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. केवळ दिखावा करुन पर्यटन वाढवता येत नाही, असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
एअर इंडियाच्या या निर्णयाचा लंडनमध्ये राहणाऱ्या गोमंतकीय समुदायावरही परिणाम होईल, अशी चिंता आलेमाव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, "गोवा-लंडन फ्लाइट कनेक्टिव्हिटी त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा आधार होता, जो दोन ठिकाणांदरम्यान सहज आणि सोप्या प्रवासाची संधी देत होता. आता हा आधार काढून घेतल्यामुळे त्यांना गोव्याला येणे-जाणे कठीण होईल." हा निर्णय केवळ व्यवसायाशी संबंधित नसून, तो परदेशात राहणाऱ्या गोमंतकीयांच्या भावनेशी आणि सोयी-सुविधांशी जोडलेला आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
शेवटी, आलेमाव यांनी इशारा दिला की, "जर पर्यटन क्षेत्राला पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर येत्या कााळात गोव्याला मोठा फटका बसू शकतो.'' सरकारने आपल्या धोरणांचा फेरविचार करावा आणि गोव्याला पुन्हा एकदा पर्यटनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.