

पणजी: पर्यटन हंगामाच्या तोंडावर विधानसभा निवडणुका घेण्याच्या हालचालींवर आता पर्यटन क्षेत्रातून उघड नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम (टीटीएजी) संघटनेने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र पाठवून डिसेंबर २०२६ मधील प्रस्तावित निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. पर्यटन हंगामाच्या काळात निवडणुका घेणे म्हणजे राज्याच्या अर्थकारणावरच घाला घालणे, असा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी पत्रात म्हटले आहे की, डिसेंबर महिना हा राज्यातील पर्यटन व्यवसायाचा कणा मानला जातो. ख्रिसमस, नववर्ष आणि विविध सांस्कृतिक उत्सवांसाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक गोव्यात दाखल होतात.
या एका महिन्यातूनच हॉटेल व्यवसाय, किनाऱ्यांवरील शॅक्स, वाहन व्यवसाय, मार्गदर्शक, लहान व्यापारी आणि स्थानिक विक्रेते यांना वर्षभराच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा मिळतो. मात्र, अशा काळात निवडणुका झाल्यास राज्यात प्रचारसभा, मोठमोठे ताफे, बंदोबस्त, वाहतूक कोंडी आणि निर्बंधांचे सावट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे रात्रीचे कार्यक्रम, सांस्कृतिक सोहळे आणि पर्यटनाशी निगडित उपक्रमांवर मर्यादा येऊ शकतात, असेही संघटनेने म्हटले आहे.
राजकीय सोयीपेक्षा जनतेचा विचार करा
राज्याच्या अर्थकारणाचा मोठा भाग पर्यटनावर अवलंबून असताना सरकारने राजकीय सोयीपेक्षा जनतेच्या उदरनिर्वाहाचा विचार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. निवडणुका पर्यटन हंगामानंतर, शक्यतो फेब्रुवारीअखेर घेण्यात याव्यात, असा आग्रहही पत्रातून धरण्यात आला आहे. आता सरकार पर्यटन क्षेत्राच्या या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणार की राजकारणासाठी पर्यटनाचा बळी देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.