

पणजी: अखिल भारतीय व्याघ्र गणनेचा भाग म्हणून राज्यात येत्या मार्चच्या मध्यापासून मे अखेरपर्यंत तीन महिन्यांची व्याघ्र गणना मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये जमिनीवर आधारित सर्वेक्षण, उपग्रह डेटा आणि कॅमेरा ट्रॅप आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती वन खात्याच्या सूत्रांनी दिली.
व्याघ्र गणनेसाठी गोव्यातील वनविभागातील कर्मचाऱ्यांना भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकारिणीच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. या गणनेचा पहिला टप्पा मार्चमध्ये पार पडेल. त्यात वन खात्याने तयार केलेली पथके वाघांच्या उपस्थितीचे पुरावे नोंदवतील.
त्यात वाघांच्या पावलांचे ठसे, नखांचे व ओरखड्यांच्या खुणा, विष्ठेचे नमुने तसेच वाघांनी केलेल्या भक्ष्यांच्या अवशेषांचा समावेश असेल. दुसरा टप्पा उपग्रह व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे पार पडेल. यात उपग्रह व रिमोट सेन्सिंगचा वापर करून वनक्षेत्राचा विस्तार, भूभागाची रचना, जलस्रोत आणि संभाव्य मानवी अतिक्रमणाचा अभ्यास केला जाणार आहे.
तर, तिसऱ्या टप्प्यात कॅमेरा ट्रॅप व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधारे वाघांची गणना केली जाणार आहे. या टप्प्यात सर्वेक्षणात निश्चित केलेल्या पायवाटा, डोंगररांगा आणि पाणवठ्यांवर कॅमेरा ट्रॅप बसविण्यात येणार असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने प्रत्येक वाघाची ओळख पटविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.