
पणजी: शिक्षण मंत्रालयाने केलेल्या ‘परख’ सर्वेक्षणातून राज्यातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची भाषा आणि गणित या दोन विषयांतील कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे समोर आले आहे.
सरकारने आता तिसरीच्या विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच यासंदर्भात शिक्षण संस्थांच्या प्रमुखांशी सखोल चर्चा करून धोरण निश्चित केले जाणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) संचालक मेघना शेटगावकर यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना दिली.
शिक्षण मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी देशभरातील तिसरी, सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘परख’ सर्व्हेक्षण केले होते. यात गोव्यातील तिसरीच्या विद्यार्थ्यांची भाषा विषयातील कामगिरी (५६ टक्के) राष्ट्रीय सरासरीपेक्षा (६४ टक्के) कमी असल्याचे तसेच गणित विषयातील (५१ टक्के) त्यांची कामगिरीही राष्ट्रीय सरासरीपेक्षा (६० टक्के) कमी असल्याचे दिसून आले.
ग्रामीण आणि शहरी भागांतील आकडेवारीनुसारही दोन्हीही विभागांत गोव्यातील तिसरीचे विद्यार्थी कमी पडत असल्याचे स्पष्ट होते. भाषा विषयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कामगिरी (५५ टक्के) राष्ट्रीय सरासरीपेक्षा (६४ टक्के) ९ टक्क्यांनी, तर गणितातील कामगिरी (५१ टक्के) राष्ट्रीय सरासरीपेक्षा (६० टक्के) ९ टक्क्यांनीच कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळेच सरकारने विधानसभा अधिवेशन संपताच शिक्षण संस्था प्रमुखांसोबत याबाबत चर्चा करण्याचे निश्चित केले आहे.तिसरीचे विद्यार्थी भाषा आणि गणितात नेमके का मागे पडतात, याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी धोरण तयार करण्याचे सरकारने ठरवले आहे, असेही शेटगावकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.