

पणजी : राज्यातील प्रत्येक घरात स्मार्ट वीज मीटर बसवले गेले की वीज खाते वेळेनुसार वीज दर बदलण्याचा निर्णय घेऊ शकते. सध्या ही प्रणाली केवळ उच्चदाबाची वीज वापरणाऱ्यांसाठी असली तरी तीन वर्षांनी ती घरगुती वीज ग्राहकांसाठीही लागू होऊ शकते, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
पदस्थ अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर त्याने सांगितले, उर्जा परीक्षण (पॉवर ऑडिट) करण्यासाठी हे करणे गरजेचे आहे. कोणी वीज चोरी करत असेल तर तेही स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लगेच समजणार आहे. सध्याच्या डिजिटल मीटरला ऑटेमेटेड मीटर रिडींग हे उपकरण बसवून किती वीज वापरली याची तासावार माहिती घेता येते.
स्मार्ट मीटरमध्ये वीजजोडणी वीज कार्यालयात बसून चालू-बंद करण्याची सोय असेल. स्मार्ट मीटर वीज वापर मोजणे, पाठवणे आणि नियंत्रण ठेवणे हे सर्व स्वयंचलित पद्धतीने करते. यामुळे पारदर्शकता वाढते, बिल अचूक येते आणि वीज बचतीला चालना मिळते.
स्मार्ट मीटरमध्ये ग्राहक परस्पर बदल न करण्याची सुविधा असते. कोणीतरी मीटरशी छेडछाड केली किंवा वीज चोरी केली तर तत्काळ सूचना कंपनीला जाते.
या मीटरद्वारे मिळालेल्या माहिती वीज खाते संस्था वीज दाब संतुलन, मागणीचे अंदाज आणि वितरण व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करू शकते.
ग्राहकाला मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी एक ॲप दिले जाईल. त्यात त्याच्या वीज वापराची माहिती मिळेल. कोणत्या वेळी कोणते दर आहेत आणि किती वीज वापरली जाते, याचा हिशेब मांडून वीज कशी वापरावी याचे मार्गदर्शनही या ॲपच्या माध्यमातून केले जाणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५, सायंकाळी ५ ते रात्री १, रात्री १ ते सकाळी १० अशा तीन पाळ्यांमध्ये वीज दर बदलले जाऊ शकतात.
राज्यात बसवण्यात येणारे स्मार्ट वीज मीटर हे प्रीपेड असतील. जसे मोबाईलला रिचार्ज केले जाते तसे हे मीटर रिचार्च करावे लागतील. रिचार्जची रक्कम रात्री मध्यावर संपली म्हणून वीज खंडित केली जाणार नाही, तर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत ती सुरू ठेवली जाईल. रविवारीही रिचार्ज संपला म्हणून वीजपुरवठा बंद केला जाणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.