

पणजी: वीज खात्याकडून नव्याने रात्रीच्यावेळीस अधिक वीज वापरास २० टक्के अधिक करवाढ करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो खात्याने दिवसाढवळ्या गोव्यातील ग्राहकांवर दरोडा टाकला आहे. खात्याने ही वीज दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास त्याविरोधात आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा आम आदमी पक्षाने शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, प्रवक्ते वाल्मिकी नाईक आणि सिद्धेश भगत यांची उपस्थिती होती.पालेकर म्हणाले, वीज खात्याच्या घोषणेमुळे भाजप सरकारची सामान्य गोमंतकियांप्रती असंवेदनशीलता उघड झाली आहे.
ही नवी वीजदर वाढ होण्यापूर्वीच नागरिक आधीपासून २५ टक्के अधिक दर भरत असल्याचे वीज बिल दाखवत ते म्हणाले, राज्यातील सरकार नागरिकांना पुन्हा अश्मयुगीन काळात घेऊन जात आहे, रात्रीच्या वेळी तेल दिवे वापरावेत, असे सांगत असावे.
जनतेला दिवसाच्या शेवटी म्हणजेच रात्रीच्यावेळी कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यापासून परावृत्त करत आहे. एकत्रित टीव्ही पाहण्यापासून, तसेच ईव्ही वाहने चार्जिंग करण्यापासून लोकांना सरकार दूर करीत आहे, असेच यावरून दिसते.
युवा विभागेचे उपाध्यक्ष भगत म्हणाले, राज्यातील नेत्यांवर मोठा खर्च केला जात असून, ते सामान्यांना लुटत आहेत. भाजप सरकार आणि त्यांचे मंत्री हेच खरे नरकासूर आहेत, जे सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी बसले असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सरकारच्या या धोरणावर जोरदारी टीका केली.
बहुतांश चालक हे त्यांची ईव्ही वाहने रात्रीच्या वेळी चार्ज करतात. या नवीन घोषणेमुळे सर्व ईव्ही धारकांना मोठा फटका बसणार आहे. एका बाजूला सरकार ईव्ही वाहन वापरा म्हणून प्रोत्साहन देते आणि दुसऱ्या बाजूला त्यांना बॅटरी चार्जिंगपासून दूर सारत आहे, यावरून सरकारचा ढोंगीपणा दिसत असल्याची त्यांनी टीका केली.
ऐन दिवाळीतच सरकारने वीजदरात २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु हा सर्वसामान्य गोमंतकीयांच्या हिताचा नसून हा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी केला आहे.
परब म्हणाले, सरकारने रात्री वीज अधिक वापरणाऱ्यांवर अधिक भार घालणार असल्याचे म्हटले आहे परंतु सर्वसामान्यपणे रात्रीच विजेचा वापर अधिक होत असतो. आज राज्यातील हवामानाची स्थिती अशी आहे, की प्रत्येक घरात वातानुकूलित सेवा, फ्रीज, पंखा आणि विजेची उपकरणे आवश्यक झाली आहेत. राज्यात बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेकांच्या हाताला रोजगार नाही अशा परिस्थितीत सरकारने विजेचे दर वाढविणे कितपत योग्य आहे ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
वीज ही ऐषआरामात गणली जाणारी वस्तू नाही. वीज ही गरज आहे, तरीही तिच्या वापरावर अतिरिक्त करवाढ म्हणजे सामान्य लोकांची पिळवणूकच, असे मत सरदेसाई यांनी म्हटले आहे.
रात्रीच्यावेळी केल्या जाणाऱ्या विजेच्या वापरावर २० टक्के अतिरिक्त कर लावण्याचा जो गोवा सरकारने निर्णय घेतला आहे, तो निर्णय म्हणजे, केंद्र सरकारने जी हरित उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न चालविला आहे, त्याला फासलेला हरताळ आहे, अशा शब्दांत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे.
सरदेसाई यांनी आज या संदर्भात एक व्हिडिओ जारी करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वरचे इंजीन आणि खालचे इंजीन या दोन्ही इंजिनामध्ये योग्य तो समन्वय नाही, हेच यातून सिद्ध होते, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.