
राज्यात श्रावण महिना अर्धा संपलेला आहे. अवघ्या १५ दिवसांनी गणेश चतुर्थी सण येऊन ठेपला आहे. लोकांना गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. प्रत्येक जण घरात साफ सफाईची कामे करीत आहेत. २७ आॅगस्ट रोजी हा चतुर्थी उत्सवास सुरुवात होईल. या सणाच्या तयारीसाठी विविध प्रकारे आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची मोठी संधी लाभत असते. चतुर्थीच्या आधी वाळपई बाजार पेठेत विविध प्रकारच्या सजावटीच्या तसेच खाद्यपदार्थ, नेवऱ्यासह ओझ्याच्या सामनांची रेलचेल असते.
चतुर्थी हा गणरायाच्या सेवे बरोबरच अनेकांना रोजगार देणारा सण आहे. त्यात प्रत्येक कुटुंबांचा सहभाग होताना दिसतो. शिंपी, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, इलेक्ट्रिकल साहित्य व्यावसायिक, रंग विक्रेते, रानभाज्यांची विक्री, रान फळांची विक्री, कंदमुळे, मखर सजावटीसाठी साहित्य, माटोळी, भेटवस्तू अशा विविध प्रकारच्या साहित्याची रेलचेल बाजारात असते. लोकांना एक मोठा आर्थिक विकास होण्यासाठी पाठबळ मिळण्यास दिसून येतो. त्यामुळे समाजातील तळागळापर्यंत लोकांना व्यावसायिकांच्या बाबतीत हा सण खूप काही देऊन जातो.
गोव्यात ग्रामीण भागात रानावनात नैसर्गिकपणे येणारी फळे यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. माटोळीला बांधण्यासाठी ही फळे कामी येतात. बाजार पेठेत यांची प्रचंड उलाढाल होत असते. बाजारपेठेत नवीन नारळ, शहाळी यांच्या विक्रीतून बळी राजाला एक प्रकारे आर्थिक बळ प्राप्त होत असते. रानातील वेलवर्गीय दोरी, कुंब्याची दोरी या विक्रीसाठी उपलब्ध असतात. बागायती मधील सुपारी (पोफळी) फळांचा घोस हजाराच्या घरात एक असा विकला जातो. नारळांचे घोस (शेल) देखील पाचशेपासून विक्री होत असतात. अळूची पाने, माड्या, करांदे, कच्ची पपई, भाजीची केळी, नीरफणस, भोपळा, शेंगा अशा कंदमुळांची विक्री होते. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना हा सण एक प्रकारे आर्थिक नवजीवन देणारा सण असतो.
वाळपई बाजार पेठेत अजून मोठ्या प्रमाणावर गणेश चतुर्थी सामान खरेदीसाठी आलेले नाही. पण हळूहळू काहींनी दुकानात चतुर्थी सामान आणले आहे. इलेक्ट्रीकल वस्तू खरेदीवर पूजा इलेक्ट्रीकल आस्थापनात योजना सुरु आहे. गणेश चित्र शाळेत गणपती तयार करण्यास कारागिर व्यस्त आहेत. घर रंगविण्यासाठी विविध रंग दाखल झाले आहेत. वाळपई सुपर मार्केटमध्ये लाकडी पाट, लाटणी असे लाकडी सामान उपलब्ध झाले आहे. मखर सजावटीसाठी पडदे, माटोळी सामान उपलब्ध आहेत.
बाजारात परराज्यातून देखील व्यावसायिक येतात. घुमट वाद्य, समेळ, टाळ, झांज, पेटी, तबला अशांची देखील विक्री होते. केवळ चतुर्थी सणा पुरतेच मर्यादीत येणारे असे वाद्य विक्री व्यावसायिक यांनाही प्रोत्साहन देणारा सण मानला गेला आहे. हल्लीच्या जमान्यात घुमट वाद्याला जे चामडे वापरले जाते ते बकरीचे असते. वनखात्याने गारीचे चामडे विक्रींवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे बकरीच्या चामड्यां पासून केलेल्या घुमटांना प्रचंड मागणी वाढलेली आहे.
महिलांच्या बाबतीत खाणारे पदार्थ जसे तळलेल्या नेवऱ्या, मोदक, लाडू बनवून विक्रीसाठी वाव मिळतो. चतुर्थी आधी चार पाच दिवस प्रदर्शन विक्रीतून महिलांना स्वयंरोजगारांचे साधन प्राप्त होते. नवीन विवाह झालेल्या घरी माहेर घरातून सर्व सामान दिले जाते. त्यासाठी लाकडी साधने करण्यासाठी कारागिरांना सांगितले जाते. त्यामुळे ग्रामीण कारागिरांना यातून रोजगार मिळतो. गावपातळीवर लाकडी माटोळी करण्यास सांगितले जाते. करंज्या करण्यासाठी नवीन पोळपाट करणे असे साधने करण्यासाठी आत्मनिर्भर होण्यास मेस्त कारागीर यांना वाव मिळतो.
सजावटीसाठी दुकानांनी रंगबेरंगी साहित्य टांगलेले असते. हार, पताका, मखरे, विद्युत उपकरणे साहित्य विक्रीतून नफा होतो. गावठी काकडी, दोडगी, भेंडी अशा फळभाज्या विक्रीतून स्थानिकांना रोजगार मिळतो. एरव्ही स्थानिक लोक बाजार पेठेत, रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करीत असतातच. पण चतुर्थी सण यांना आर्थीक घडी मजबुतीचा सण असतो. देवकार्यासाठी लागणारी फुले, हार, सुटी फुले, गुलाब फुले यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. सुवासिक द्रव्यांना देखील मागणी असते. त्यामुळे सणाच्या निमित्ताने विविध योगे करून लोकांना रोजगार मिळून चतुर्थी सणात लाभार्थी यश मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.