
थिवी: शिरगावच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत थिवी गावातील तीन धोंड भाविकांचा बळी गेला. त्यामुळे गावात गेल्या दोन दिवसांपासून स्मशान शांतता पसरली आहे. त्यांच्या घरातील लोकांचा आक्रोश काळीज हेलावून सोडत आहेत तर लहान मुले निःशब्द होऊन दु:खी चेहऱ्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पाहत आहेत.
माडेल-थिवी येथील स्व. यशवंत प्रभाकर केरकर यांच्या घरी नातेवाईकांसह गावातील लोक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची वर्दळ असून, ते कुटुंबीयांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काही नातेवाईक मुंबईहून आले आहेत. यशवंत यांची आई व बायको अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. घरातून जाताना एवढ्या आनंदाने गेलेला मुलगा परत सुखरूप आला नसल्याचे आई सर्वांना सांगत होती. बायकोचा आक्रोश पाहून सर्वांच्या डोळ्यांत पाणी येत होते. मुलगी रिशिता (११) व मुलगा यशवीत (७) एका जागी गप्प बसून होती. काळाने त्यांचे बापाचे छत्र हिरावून घेतले आहे.
हिच स्थिती अवचितवाडा-थिवी येथील आदित्य व तनुजा कवठणकर यांच्या घरी दिसत होती. एकाच कुटुंबातील पुतण्या व काकीचा मृत्यू झाल्यामुळे घरातील मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याने आदित्यने फार आनंदात होता. आता तो अकरावीत जाणार होता.
परंतु कालच्या चेंगराचेंगरीत त्याचा बळी गेला. घरातील एकुलता एक मुलगा ज्याच्यावर आईवडिलांचे म्हातारपण अवलंबून होते, तोच आधार गेल्याने मायबाप ओक्साबोक्षी रडत होते.
तनुजा कवठणकर ही आदित्यची काकी. तिचाही चेंगराचेंगरीत बळी गेला. जत्रोत्सवाला मुलगी रुतिकाही त्यांच्यासोबत होती. ती खाली रस्त्यावर कोसळली. ती ओरडत होती, पण अनेकांचे पाय तिला चिरडत पुढे जात होते. सुदैवाने तिचा पाय फ्रॅक्चर होण्यावर सर्व निभावले. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनीसुद्धा घरी भेट देऊन तिन्ही कुटुंबांचे सांत्वन केले. पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी आपल्याला भेटून त्यांच्या वतीने सांत्वन करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत थिवीचे आमदार तथा मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, थिवी सरपंच व्यंकटेश शिरोडकर, पंच तुळशीदास शिंदे, सुनीता साळगावकर, समीक्षा मयेकर यांची उपस्थिती होती.
शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेत झालेली चेंगराचेंगरीची घटना अत्यंत वेदनादायी आहे. गोव्यातील ही मोठी जत्रा असून अन्य राज्यांतील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत असतात.
या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर कित्येक जण जखमी झाले. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सरकारतर्फे सर्व मदतकार्य सुरू केले. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला, असेही त्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.