

Goa Shipyard launches Akshay and Amulya for Indian Coast Guard
वास्को: येथील गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या अक्षय व अमूल्य या दोन जलद गस्ती जहाजांचे रविवारी (ता. ५) दुपारी एकाचवेळी संरक्षण उत्पादनचे सचिव संजीव कुमार यांच्या पत्नी वंदना अग्रवाल यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले.
संजीव कुमार यांनी भारतीय तटरक्षक दल व गोवा शिपयार्डच्या सहकार्याचे कौतुक करून हे नाते अतूट राहावे तसेच दिवसेंदिवस ते वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या जहाजांमध्ये ६५ टक्के स्वदेशी मालांचा वापर करण्यात आला आहे. या जहाजातील गिअर बॉक्स हे भारतीय बनावटीचे असून त्याचा पहिल्यांदाच वापर करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी गोवा शिपयार्डचे कौतुक केले.
त्यांनी आपल्या भाषणात मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, विकसित भारतसंबंधी माहिती दिली. भारत देश आज जगातील पाचवी आर्थिक शक्ती बनली आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पूर्वी एक आयातदार देश म्हणून पाहिले जात होते.
परंतु आज देश निर्यातदार झाला आहे. असे ते म्हणाले. गोवा शिपयार्ड फक्त जहाजबांधणी करीत नसून, समाजातील इतर औद्योगिक घटकांना आधार देत आहे. ही चांगली गोष्ट आहे. गोवा शिपयार्डची प्रगती कौतुक करण्याजोगी आहे. गेल्या चार महिन्यात गोवा शिपयार्डने एका प्रदूषण नियंत्रण जहाजासह पाच जहाजे बांधलीत. गोवा शिपयार्डने अधिकाअधिक प्रगती करावी, असे ते म्हणाले.
शर्मा यांनी गोवा शिपयार्ड व भारतीय तटरक्षक दल यांच्यातील नाते उलगडून सांगितले. गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी अधिकाअधिक जहाजे बांधली आहेत, असे सांगून त्यांनी तटरक्षक दलाच्या कामगिरीची थोडक्यात माहिती दिली.
गोवा शिपयार्डमध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात येणाऱ्या आठ जलद गस्ती जहाजांपैकी अक्षय व अमूल्य हे तिसरे व चौथे जहाजे आहेत. यापूर्वी २८ ऑक्टोबर २०२४ मध्ये अदम्य व अक्षर या दोन जलद गस्ती जहाजांचे जलावतरण करण्यात आले होते. भारतीय तटरक्षक दलांसाठी बांधण्यात येणारी इतर गस्ती जहाजे या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतीय तटरक्षक दलाकडे सोपविण्यात येईल, असे गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी सांगितले.
गोवा शिपयार्डच्या आवारात आयोजित केलेल्या या सोहळ्याला संजीव कुमार यांच्यासह भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक एच. के. शर्मा, गोवा शिपयार्डचे ब्रजेश कुमार उपाध्याय, भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाचे मनोज भाटीया तसेच तटरक्षक दलाचे, गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वंदना अग्रवाल यांच्या हस्ते अक्षय, अमूल्य या जहाजांची विधिवत पूजा करण्यात येऊन अथर्ववेदाच्या घोषात जलावतरण करण्यात आले. उपाध्याय यांनीही गोवा शिपयार्डच्या चढत्या आलेखाचा खास उल्लेख केला. जहाजबांधणीसाठी अधिकाअधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्याचा गोवा शिपयार्डचा कटाक्ष असल्याचे ते म्हणाले.
गोवा शिपयार्ड आपल्या कामगिरीने भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी शिपयार्ड बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता काही लक्ष्य आहेत, ते साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोवा शिपयार्डच्या यशाचे श्रेय त्यांनी कामगार, अधिकारी यांच्यासह नावीन्य, आधुनिकीकरण इत्यादी गोष्टींना दिले.
खोल समुद्रातील मालमत्तेचे, बेटांचे, इतर प्रदेश संरक्षित करण्यासाठी तसेच पाळत ठेवणे, ऑपरेशन्स करण्यासाठी तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सदर जहाजांचे डिझाईन करून बांधण्यात आले आहेत. ही सर्वच जहाजे तटरक्षक दलासाठी बांधण्यात येत आहेत. या जहाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. खास बाब म्हणजे या जहाजात स्वदेशी साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.