
फातोर्डा: स्वयंपाक घरातील मुख्य घटक असलेल्या नारळाचे दर सध्या मडगाव परिसरात गगनाला भिडले आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी लहान आकाराच्या नारळाचा दर १५ ते २० रुपये होता तो आता २५ रुपयांपर्यंत प्रति नग असा झाला आहे, मध्यम आकाराचा दर ३० रुपये आणि मोठ्या आकाराच्या नारळाला ४० ते ४५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत. तसेच महिलांनाही स्वयंपाकघर चालविणे मुश्कील झाले आहे.
नारळाचे (Coconut) दर वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसत आहे. नारळाच्या दरात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या हवामानामुळे नारळाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. बागायतदारांकडे नारळ उपलब्ध नसल्याने त्याचे दर वाढले आहेत. हॉटेल व्यावसायिकांकडूनही नारळासाठी दररोज मागणी असते. त्यांनाही नारळ महागड्या दराने विकत घ्यावे लागतात. त्यामुळे खाद्य पदार्थाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
वाढलेल्या नारळाच्या दरामुळे मेनू कार्डवर दिलेल्या दरात वाढ करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आलेली आहे. अशाने ग्राहकांकडून (Customers) यापुढे त्यांना प्रतिसाद मिळणार की नाही या चिंतेत ते आहेत. खाणावळ चालवणाऱ्या येथील विनायक या रेस्टॉरंट मालकाने सांगितले की, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण बनविण्यासाठी रोज ३५ ते ४० नारळांची गरज असते. ५० नारळांची प्रति गोणी ६५० रुपयांना मिळत होती, आता तो दर ७०० रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे नारळापासून बनणाऱ्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत वाढ करण्याशिवाय अन्य पर्याय आमच्याकडे नसल्याचे ते म्हणाले.
गोव्यात केरळ, कर्नाटक व इतर राज्यातून नारळ आयात केला जातो, मात्र त्या ठिकाणीही खराब हवामानाचा फटका बसून नारळ उत्पादन घटले आहे. त्यामुळे गोव्यात नारळ कमी प्रमाणात दाखल व्हायला लागले आहेत, अशी माहिती बोर्डा येथील प्रमुख विक्रेत्याकडून प्राप्त झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.