
सासष्टी: सासष्टीतील राय गावानजीकच्या राशोल गावात राशोल किल्ल्याचे अवशेष सापडतात. त्यांचे जतन करण्याची मागणी इतिहास अभ्यासक करीत आहेत. हा किल्ला बहामनी राजवटीत बांधला होता. नंतर विजयनगरचे सम्राट कृष्ण देवराय यांनी तो जिंकला व नंतर पोर्तुगीजांनी तो काबिज केला.
आता या किल्ल्याचे राशोल सेमिनारीत रूपांतर केले असून गोव्यातील ख्रिस्ती धर्माच्या इतिहासाची ही खास नोंदणी आहे, अशी माहिती इतिहासकार योगेश नागवेकर यांनी दिली. तिथे किल्ल्याचे काही अवशेष आहेत. खास करून किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे व जिथून हा मार्ग सुरू होतो तिथे दरवाजाची कमान जी जशी होती तशी आहे.
या कमानीजवळ काही अवशेष सापडतात त्यांचे पुढील पिढीच्या माहितीसाठी त्याचे जतन करणे आवश्यक आहे, असे मत नागवेकर यांनी मांडले आहे. राशोल सेमिनारीला ऐतिहासिक महत्त्व आहे. पोर्तुगीज काळात इथून ख्रिस्ती धर्माचा प्रचार व प्रसार केला.
ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करण्यासाठी ऑक्टोबर १८९२ साली स्वामी विवेकानंद यांनी या सेमिनारीला भेट दिली होती. येथे जे अवशेष आहेत ते लोकांचे संरक्षण करतात अशी लोकांची धारणा आहे व त्यासाठी लोक या अवशेषांना भजतात, तिथे नारळ ठेवतात. हे अवशेष गोंयकारपणाची महती दर्शवितात, अशी माहिती नागवेकर यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांनी राशोल किल्ल्यावर स्वारी करताना अरबी समुद्राच्या झुआरी नदीच्या तटातून प्रवेश केला. येथे मराठा साम्राज्याचे अस्तित्व होते याचे पुरावे म्हणजे हे अवशेष आहेत असेही नागवेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.