
"वहां तूफान भी हार जाते हैं, जहां कश्तियां जिद पर होती हैं।
पाणी म्हणजे जल आणि जल म्हणजे जीवन. हे वाक्य अत्यंत समर्पक आहे. पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पाणी अस्तित्वात असेल तर ही जीवसृष्टी अस्तित्वात राहणार आहे अन्यथा नाही. पाणी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा आहे. पाणाच्या प्रश्नावर काम करणारे समाजात अनेक लोक आहेत. आपल्या छोट्याशा गोव्यातही पाण्याच्या प्रश्नावर काम करणारे अनेक लोक आहेत. मात्र आज (14 जून) आपण पाण्याचं दुर्भिक्ष दूर करण्यासाठी वसा घेतलेल्या एका जिद्दी माणसाच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत...
काणकोण (Canacona) तालुक्यातील लोलये जवळचं एक छोटंसं गाव मद्दी टोलोप. या गावातील एक घर, त्याच्या अंगणातली एक विहीर, आणि त्या विहिरीमागे दडलेली एका व्यक्तीच्या धाडसाची, चिकाटीची आणि मेहनतीची ही प्रेरणादायक कहाणी आहे. ही कहाणी आहे बालकृष्ण अय्या यांची (Balakrishna Aiya Inspiring Story). त्यांच्या घराच्या परिसरात पूर्वी पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता.
आज जिथे विहीर आहे, तिथे एक कठीण, पाण्यासाठी निरुपयोगी वाटणारा खडकाळ भूभाग होता. पण अय्या यांनी मात्र त्या खडकांतूनही जीवन शोधायचं ठरवलं. कधी कुऱ्हाड, कधी हातोडा, तर कधी फावड्याने ते एकेक खडक फोडत गेले. अनेक वर्षं ते अथक मेहनत करत राहिले. आज जेव्हा त्यांच्या विहिरीतून गोड पाणी येतं, तेव्हा ती फक्त एक विहीर राहात नाही, ती बनते एका माणसाच्या आशावादी दृष्टिकोनाचं आणि अढळ इच्छाशक्तीचं प्रतीक.
अय्या यांच्या घरी भेट देणारे अनेक लोक आजही या विहिरीकडे कौतुकाने पाहतात. "खडक फोडून इथं पाणी कसं काय आलं?" असा प्रश्न त्यांना पडतो. काहींना वाटतं, ही एखादी नैसर्गिक जलधारा असावी. पण फार थोड्या लोकांना या पाण्यामागचा माणूस आणि त्याची मेहनत माहिती आहे.
ही विहीर गावासाठी गोड्या पाण्याचा स्रोत तर आहेच, पण त्याहून अधिक ती एक शिकवण आहे ती म्हणजे हार मानायची नाही. कोणतीही अडचण कितीही मोठी असली तरी चिकाटी, परिश्रम आणि आत्मविश्वासाने ती पार करता येते, हे बालकृष्ण अय्या यांनी जगाला दाखवून दिलं. बाळकृष्ण अय्या यांच्या अंगणात असलेली एक विहीर आजही धाडस आणि दृढ निश्चयाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. "मद्दी-टोलोप" म्हणजे कोकणी भाषेत दगडांचा प्रदेश. आणि खरंच, ही भूमीही तशीच होती. कठीण खडकांनी व्यापलेली आणि जलस्रोताच्या दृष्टीने निराशाजनक.
बाळकृष्ण अय्या सांगतात, सर्वांनी म्हटलं की इथे विहीर खोदणे म्हणजे वेडेपणा. कोणताही पाण्याचा स्रोत इथे सापडणार नाही. त्यावेळी अभियंते आणि जलतज्ज्ञांनीही या भागाला अनुपयुक्त ठरवले होते. कारण जमीन अनेक थरांची होती. सर्वप्रथम मोठमोठे दगड, मग काही माती, आणि सर्वात खाली काळसर घट्ट खडकाचा थर.
पण अय्यांनी हार मानली नाही. आपल्या सुरकुत्या पडलेल्या हातांनी विहिरीकडे इशारा करत त्यांनी सांगितलं, मी ठरवलं विहीर इथचं होणार. अनेक महिने खडक फोडत, हातांनी माती उपसत आणि कोणीही शक्य मानलं नाही ते करुन दाखवत, त्यांनी अखेर विहीर पूर्ण केली.
आज ही विहीर केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर एका माणसाच्या निश्चयाची आणि प्रयत्नांची साक्ष आहे. आजूबाजूच्या गावकऱ्यांसाठीही ती एक प्रेरणादायक कहाणी बनली आहे.
काणकोण तालुक्यातील लोलये या गावात अनेक वर्षांपासून लोक पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त होते. गावाचं सौंदर्य निसर्गरम्य असलं, तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावकऱ्यांसाठी कायमचा डोकेदुखी ठरला होता. पण अशा कठीण परिस्थितीत एक माणूस पुढे आला. ते म्हणजे बालकृष्ण अय्या. त्यांनी जे काही केलं, ते केवळ स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण गावासाठी आदर्श ठरलं.
बाळकृष्ण अय्याला आजही ते दिवस आठवतात. अय्या सांगतात, “मी एकदा जमिनीकडे पाहिलं आणि मला काहीतरी वेगळं जाणवलं. त्या दगडांमध्येही मला आशेचा किरण दिसला.'' त्या वेळेस पाण्याची कमतरता इतकी होती की लोकांना मैलोनमैल पायपीट करुन पाणी आणावं लागे. पण अय्या यांनी हार मानली नाही. त्यांना एक कल्पना सुचली. ती म्हणजे जमिनीच्या आत खोलवर विहीर खोदण्याची. पण ही जमीन सामान्य नव्हती; ती खडकांनी भरलेली होती. तरीही अय्या यांनी आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. ते सांगतात, माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती ती म्हणजे सुरक्षिततेची शिडी तयार करायची. त्यांनी ही शिडी तयार केली आणि विहीर खोदायला सुरुवात केली.
दगडांमधून वाट काढत त्यांनी 40 मीटर खोल विहीर खोदली. बऱ्याच लोकांना वाटत होतं की, हे वेड आहे, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. पण जेव्हा त्या खडकाळ जमिनीतून पाणी बाहेर आलं, तेव्हा सगळे चकित झाले. अय्याचं स्वप्न सत्यात उतरलं होतं.
दरम्यान, पाणी लागल्यानंतरही अय्या यांनी आपलं काम थांबवलं नाही. त्यांनी त्या विहिरीत पंप बसवला आणि पाईपलाईन टाकून आसपासच्या घरांमध्ये पाणी पोहोचवायला सुरुवात केली. “माझी तहान भागली, पण मी ठरवलं की माझ्यामुळे इतरांचीही तहान भागली पाहिजे,” असं अय्या अभिमानाने सांगतात. आज त्यांच्या प्रयत्नांमुळे गावातील अनेक घरांना नियमित पाणी मिळतं आहे. अय्या केवळ एक विहीर खोदणारा माणूस नाही, तर ते गावासाठी एक दीपस्तंभ बनले. दगडांमध्येही जीवन शोधणारा आणि त्यातून समाजासाठी काहीतरी निर्माण करणारा माणूस म्हणजे बालकृष्ण अय्या....
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.