

पणजी: रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) ज्या पंच ज्युलियस आल्मेदा यांच्यावरून अंतर्गत वादंग माजलेले आहे, त्या आल्मेदांनी कारवाईनंतर प्रथमच सोशल मीडियाद्वारे तोंड उघडल्याने आरजीपीत पुन्हा खळबळ माजली आहे. पुढील काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
आगशीचे पंच आल्मेदा हे आरजीपीचे कार्यकर्ते आहेत, असा सर्वांचा समज होता. परंतु, काहीच दिवसांपूर्वी पक्षाने नोटीस जारी करीत आल्मेदा यांचा आरजीपीशी काडीमात्र संबंध नाही. किंबहूना ते पक्षाचे सदस्यही नाहीत, असे स्पष्ट केले. आल्मेदा हे पक्षाचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांविरोधात विधाने करतात. त्यामुळे त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीतून देण्यात आला होता.
पक्षाच्या या भूमिकेमुळे सांतआंद्रे मतदारसंघातील आरजीपीच्या कार्यकर्त्यांत पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्याबाबत कमालीचा संताप पसरला होता. पक्षांतर्गत सुरू असलेला वाद चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी पक्षाच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी प्रयत्न करीत असतानाच, आमदार बोरकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना, पंच ज्युलियस आल्मेदा यांच्यावरील कारवाईनंतर पक्षात वाद सुरू झाल्याच्या वृत्ताला अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला.
पंच ज्युलियस आल्मेदा यांच्यावरील कारवाईनंतर आरजीपीत मनोज परब आणि वीरेश बोरकर असे दोन गट पडले आहेत. सांतआंद्रेतील कार्यकर्त्यांनी पूर्ण पाठिंबा आमदार बोरकर यांना दिला आहे. तर, केंद्रीय समितीचे पदाधिकारी मनोज परब यांच्या बाजूने असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सांतआंद्रेतील काही कार्यकर्त्यांकडून आगामी विधानसभा निवडणूक बोरकर यांनी आरजीपीकडून लढवू नये, अशी मागणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.