
पणजी: मंत्रिमंडळातील सगळेच मंत्री चांगले काम करत आहेत. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. त्यानुसार त्यांचे काम सुरू आहे. काम करत नाही म्हणून कुठल्याही मंत्र्याला काढले जाणार नाही. एका-दोघांना हटवावे लागले तर ते पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या अनुषंगाने असेल, असे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत दिले.
गेल्या काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळ फेरबदलासह काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वी सभापती रमेश तवडकर यांनी पुढील पंधरा दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदल होईल, असे सांगत या चर्चेला पुन्हा तोंड फोडले.
त्यानंतर काहीच दिवसांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत जाऊन यासंदर्भात केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आजचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
चार दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या गाठीभेटी घेत मंत्रिमंडळ फेर बदला संदर्भात चर्चा केल्या. त्यानंतर येत्या मंगळवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष नाईक दिल्लीला जाणार असल्याने मंत्रिमंडळ फेर बदल होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
पुढील विधानसभा निवडणूक जिंकून सलग चौथ्यांदा राज्यात सरकार स्थापन करणे हेच आपल्या पक्षाचे ध्येय आहे. त्यामुळे सरकार घडवण्याच्या दृष्टीनेच मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय होईल. अर्थात या निर्णयासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.