गोवा व कर्नाटक वन खात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे पारवाड-साट्रे रस्ता व पुलाचे काम रखडले, आता खानापूरचे नूतन आमदार विठ्ठल हलगेकर व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे या रस्त्याच्या अंमलबजावणीसाठी फायदा होणार असल्याची आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
गोव्यात जाण्यासाठी पारवाडमार्गे (ता. खानापूर) केवळ दहा किलोमीटरचे अंतर असणाऱ्या गोव्यातल्या साट्रे गावांमधील पोर्तुगीजकालीन रस्ता, तसेच म्हादई नदीवरील पुलाला गोवा शासनाने मागीलवर्षी मंजुरी दिली होती. मात्र, गोवा आणि कर्नाटकातील वनखात्याच्या आडकाठीमुळे हा प्रकल्प रखडला होता.
सध्या कर्नाटकातून गोव्याला जाण्यासाठी जवळपास ६५ कि.मी.चे अंतर आणि त्यात तीस कि.मी.चा घाट उतरावा लागतो. मात्र, पारवाडमधून या रस्त्याने गेल्यास केवळ दहा ते पंधरा कि.मी. अंतर लागणार आहे. पोर्तुगिजांनी बेळगावला जाण्यासाठी या रस्त्याची निर्मिती केली होती. कर्नाटक-गोवा शासन दरबारीही याची नोंद आहे. मात्र, हा रस्ता दोन्ही राज्याच्या वन्यप्रदेशातून जात असल्याने विकास होऊ शकला नाही. विकास न झाल्याने झुडपे वाढून भग्नावस्थेत असलेला ब्रिजही ढासळून गेला आहे. सध्या केवळ पाणंद शिल्लक आहे. त्यामुळे या वाटेवरून पायपीट करणे धोक्याचे ठरते.
यासंदर्भात साट्रे गावातील नागरिकांनी रस्त्यासंदर्भात नगरगाव पंचायतीत गेल्या ऑक्टोबर २०२१ मध्ये ठराव संमत करून यासाठी गोवा शासनाकडे पाठपुरावा केला होता. नुकतीच गोव्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी साट्रे-पारवाड रस्ताकामाला तातडीने मंजुरी मिळवून दिली होती. मात्र, त्यानंतर कर्नाटक वनखात्याने याला विरोध दर्शविला. खानापूरचे नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले हे काम पूर्ण झाल्यास गोव्यातील गावांचे सीमेवरच्या गावांशी मैत्रीपूर्ण संबंध जुळून येतील. तसेच नागरिकांनाही सोयीचे होणार आहे.
विकासासाठी रस्ता उपयुक्त
पारवाड ते साट्रे हा रस्ता झाल्यास पारवाड गावासह कणकुंबी आणि त्याशेजारील गवळीवाड्यांनाही चांगले दिवस येतील. पारवाड आणि गोव्यातली संस्कृती एकच असल्याने कला-साहित्यासह रोटीबेटी व्यवहार वाढतील. पारवाड गावासाठी उत्पन्नाचे कोणतेच स्त्रोत नसल्याने गोव्यातील कामावर गावचे अर्थकारण चालते. या भागातील ७० टक्के जनता गोव्यात असून हा रस्ता त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.
पोर्तुगीजकालीन रस्ता
पोर्तुगीज काळात वाळपई, नागोडा, कोदाळी, साट्रे व त्यापुढे कर्नाटकातील पारवाड गावाला जोडणारा रस्ता अस्तित्वात होता. या रस्त्याने तेव्हा पोर्तुगीज सैनिक आणि अधिकारी ये-जा करत होते. मात्र, गोवा मुक्तीसाठी कूच केलेल्या भारतीय सैन्याला रोखण्यासाठी पोर्तुगिजांनी पारवाड आणि साट्रेमधील म्हादई नदीवरील मोठा दगडी पूल सुरुंग लावून तोडला होता. त्यामुळे गोवा आणि कर्नाटकाचा संपर्क तुटला. गोवामुक्तीनंतर या रस्त्याकडे गोवा शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याने अस्तित्व गमाविले. त्यानंतर चोर्ला घाटमार्गे नवा मार्ग तयार करण्यात आला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.