Goa Nepali Passengers: नेपाळला गेलेले 'गोमंतकीय' सुखरूप परतले! रोजगारासाठी ये-जा करण्याऱ्यांबाबत सध्या प्रश्नचिन्ह
पणजी: सोशल मीडियावर सरकारने घातलेल्या बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणाईने सुरू केलेली नेपाळमधील जाळपोळ कायम आहे. परंतु, त्या उद्रेकाचा नेपाळला बसमधून गेलेल्या गोमंतकीयांना अजिबात फटका बसला नाही. चालू आठवड्यात गोव्यातून गेलेले सर्व प्रवासी सुखरूप परतले, अशी माहिती गोवा नेपाळी संघाचे अध्यक्ष प्रकाश थापा यांनी गुरुवारी ‘गोमन्तक’ला दिली.
नेपाळ सरकारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्याचे तीव्र पडसाद लगेच देशभर उमटले. सरकारच्या या निर्णयाला विरोध करून तरुणाई रस्त्यावर उतरली. सरकारचा निषेध नोंदवत तरुणाईने थेट संसद, न्यायपालिका, पंतप्रधानांचे निवासस्थान तसेच अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांना लक्ष्य केले. यातील अनेक इमारतींना त्यांनी आग लावली, तर काही मंत्र्यांना घरातून बाहेर काढत मारहाणही केली.
या घटनेनंतर राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने सरकार कोसळले आणि लष्कराने नेपाळचा ताबा घेतला आहे. नेपाळमधील हिंसाचाराची धग कायम असतानाच तेथील कैद्यांनी तुरुंग फोडून पलायनही केले आहे. या पार्श्वभूमीवर, नेपाळमधून गोव्यात व्यापार किंवा रोजगारासाठी ये-जा करणाऱ्यांच्या स्थितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, नेपाळमधून गोव्यात येण्यासाठी किंवा गोव्यातून नेपाळमध्ये बसमधून प्रवेश करण्यासाठी भारतीय आधारकार्ड आणि नेपाळी नागरिक असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे असते. त्यांची सीमेवर तपासणी करण्यात येते. त्यानंतरच त्यांना नेपाळ किंवा भारतात प्रवेश देण्यात येतो, असेही थापा यांनी नमूद केले.
सीमेवरही अडचणी नाहीत!
प्रकाश थापा यांच्याशी संपर्क साधला असता, गोव्यातील विविध भागांत सुमारे ५० हजार नेपाळी नागरिक राहतात. त्यातील अनेकजण रोजगाराच्या निमित्ताने गोव्यातच स्थायिक झाले आहेत. नेपाळला त्यांची ये-जा सुरू असते. त्यांच्यासाठी गोव्यातून आठवड्याला दोन खासगी बसेस सोडल्या जातात. चालू आठवड्यातही दोन बसेसमधून ४० ते ५० जण नेपाळला गेले आणि सुखरूप परतले. भारत-नेपाळ सीमेवरही त्यांना अडचणी आल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.
नेपाळ १०० वर्षे मागे गेला!
सोशल मीडियावरील बंदीमुळे हिंसाचार पसरलेला नेपाळ १०० वर्षेे मागे गेला आहे. जाळपोळ, दंगलींमुळे नेपाळची मोठी हानी झाली आहे. तेथील सरकार आज ना उद्या कोसळणार, हे नक्की होते. परंतु, वाद सामोपचाराने न मिटवता आंदोलकांनी जे उग्र आंदोलन छेडले, त्याचा स्थानिक जनतेला मोठा फटका बसला. सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, अशी खंत प्रकाश थापा यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.