

मडगाव: पावसाळी पर्यटनाचा मुद्दा जटील बनला आहे. सुर्ल-वाळपई येथील धबधब्यावर आंघोळीसाठी गेलेल्या बेळगावच्या १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी मेटावाडा-कुळे येथील दूधसागर नदीत तीन सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू, तसेच बागा किनाऱ्यावर प्रचंड लाटेने पर्यटकाला ओढून नेल्याची घटना राज्याला हादरवून गेली होती.
समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात असले तरी अंतर्गत धबधबे, नद्या आणि खाणींमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने तेथे धोका अधिक असतो. पाण्याचा वेग, खोली आणि अंतर्गत प्रवाहांचा अंदाज न आल्याने अनेकजण वाहून जातात.
सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फी किंवा छायाचित्रे काढण्याच्या नादात धोकादायक खडकांवर जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. बागा किनाऱ्यवरील अलीकडील दुर्घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. तसेच मित्रांचे अनुकरण करत पोहता न येणारे तरुणही खोल पाण्यात उतरल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
प्रशासनाची खबरदारी
वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धोकादायक जलस्थळांवर पोहण्यास बंदी, पडक्या खाणींना कुंपण आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा उपाय वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. धारबांदोडा प्रशासनाने १७ धोकादायक स्थळांची नोंद करून विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.
बुडून मृत्यूची प्रमुख कारणे
पाण्याचा अंदाज न घेता धबधबे, नद्यांमध्ये उतरणे
मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे
पोहता न येताही खोल पाण्यात जाणे
जीवरक्षकांच्या सूचना, लाल बावट्यांकडे दुर्लक्ष
सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फी आणि स्टंट करण्याचा मोह
जलक्रीडांवर ६० दिवस बंदी
दक्षिण गोवा तसेच कुशावती जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांतील धबधबे, पडक्या खाणी, नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पोहणे, आंघोळ करणे व पाण्यात उतरण्यास पुढील ६० दिवस बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.