
पणजी: मान्सूनचा पाऊस यंदा राज्यात सुमारे बारा दिवसांआधीच दाखल झाला असला, तरी आत्तापर्यंत पडलेला पाऊस गतवर्षीच्या तुलनेत ५१.४० इंचांनी कमी झालेला आहे. गेल्यावर्षी १ जून ते २८ सप्टेंबर या काळात राज्यात १७२.३७ इंच पावसाची नोंद झालेली होती. यंदा मात्र या काळात १२१.३७ इंच पाऊस पडलेला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनपूर्व पावसाने काही दिवस संपूर्ण राज्याला झोडपून काढले. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही वेळेआधीच राज्यात दाखल झाल्याने यंदा पावसाचे प्रमाण अधिक असेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार मान्सून सुरू झाल्यानंतर काही दिवस पावसाने राज्यभर हजेरी लावली.
परंतु, नंतरच्या काळात त्याने दडी मारली. गणेश चतुर्थी काळात अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनच्या पावसाला पोषक वातावरण मिळाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा राज्याला घेरले. पण, चतुर्थीनंतर पावसाच्या प्रमाणात घट झालेली होती.
आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला असून, गेल्या पाच ते सहा दिवसांत काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस पावसाचे प्रमाण कायम राहील असा अंदाज वर्तवत हवामान विभागाने राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
दरम्यान, यंदाच्या मान्सून हंगामात आत्तापर्यंत १२१.३७ इंच पाऊस पडलेला आहे. या काळात सरासरी ११७.८१ इंच पावसाची नोंद होते. यातून यंदाचा पाऊस सरासरीच्या तुलनेत तीन टक्के अधिक असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत मात्र तो ५१.४० इंच इतका कमी असल्याचे हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेले काही दिवस राज्यात तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. ही परिस्थिती येत्या २ ऑक्टोबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज वर्तवत हवामान खात्याने येत्या २ ऑक्टोबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.