
पणजी: ‘मिशन सरोवर पुनर्निर्माण’ या मोहिमेंतर्गत २०३० पर्यंत १० तळी पुनरुज्जीवित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी तयार केलेली प्रारूप श्वेतपत्रिका पर्यावरण सचिवांच्या माध्यमातून येत्या आठवडाभरात मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केली जाणार आहे.
पर्यावरण खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि टिकाऊ व्यवस्थापन साधण्यासाठी राज्य सरकारने ‘मिशन सरोवर पुनर्निर्माण’ या व्यापक आराखड्याला गती देण्याची तयारी केली आहे. त्यासाठीची प्रारूप श्वेतपत्रिका तयार करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे केवळ तळी किंवा सरोवरे स्वच्छ करण्यावर भर न देता, ती स्थानिक समाज, शिक्षण संस्था आणि ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्याशी जोडण्याचा प्रयत्न आहे.
या मोहिमेत शाळांच्या अभ्यासक्रमात तळी व्यवस्थापनाचा समावेश करण्याची आणि ग्रामपंचायतींच्या वार्षिक आराखड्यात जलसंवर्धन प्रकल्प अनिवार्य करण्याची सूचना करण्यात आली आहे. स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून तळींचे नियमित निरीक्षण आणि देखभाल करण्याचे नियोजनही तयार करण्यात आले आहे.
तळींच्या स्थितीचे रिअल-टाइम निरीक्षण करणारे डेटा डॅशबोर्ड, स्थानिक ग्रामसभा-जैवविविधता व्यवस्थापन समित्या भागीदारीतून देखभाल यंत्रणा, भूजल पुनर्भरणात वाढ, तसेच हवामान बदलाशी लढण्याची क्षमता वाढवणे हे या उपक्रमाचे प्रमुख परिणाम अपेक्षित आहेत.
या उपक्रमासाठी निधी उभारणी विविध स्रोतांद्वारे करण्याचा विचार आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय तळी संरक्षण संचालनालयाचा निधी, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत हॉटेल, खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रातील भागीदारी, स्थानिक नागरिकांकडून सहभागी निधी, तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पर्यावरणपूरक पर्यटन आणि वारसा हक्क तळी पुनरुज्जीवन यांसारखे प्रकल्प राबवले जाणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.